भारत-चीन सीमेवर सैनिकांनी गोळीबार न करता हाणामारी का केली?

india china border
india china border

नवी दिल्ली - भारत आणि चीन यांच्यातील संघर्षावरून आता देशात चीनी वस्तूंवर बहिष्काराची मोहीम सुरू झाली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चीनने भारताच्या निशस्त्र सैनिकांवर हल्ला कसा केला? सैनिकांना निशस्त्र सीमेवर कोणी पाठवलं असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला देशाचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी उत्तर दिलं आहे. जयशंकर यांनी म्हटलं की, चीन आणि भारत यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार दोन्ही देशांचे सैनीक सीमेवर स्फोटक शस्त्रांचा वापर करत नाहीत. 1996 आणि 2005 मध्ये हे करार झाले होते. 

जयशंकर म्हणाले की, सीमेवर तैनात असणाऱ्या सर्व जवानांकडे शस्त्रे असतात. विशेषत: तेव्हा जेव्हा ते पोस्टपासून दूर जातात. गलवानमध्येही 15 जूनला असंच झालं होतं. करारानुसार दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाल्यास शस्त्रास्रांचा वापर केला जात नाही. जयशंकर यांच्यानंतर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनीही राहुल गांधी यांना लॉकडाऊनच्या काळात पुस्तके वाचली असतीत तर बरं झालं असतं असा खोचक सल्ला दिला आहे. 

चीन आणि भारत सीमेवर जवान गस्त घालताना नेहमीच एकमेकांसमोर येतात. यामध्ये बऱ्याचदा चीनकडून कुरघोडी करत भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा परिस्थितीत वातावरण तणावपूर्ण बनते. दोन्ही देशांमध्ये करार झालेला असल्यानं सीमेवर गोळीबार किंवा इतर स्फोटक शस्त्रास्त्रांचा वापर केला जात नाही. 

प्रत्यक्ष ताबा रेषेवर शांतता रहावी यासाठी चीन आणि भारतातमध्ये काही करार झाले आहेत. 1993 ला झालेल्या करारानुसार सीमेवर तणावाचं वातावरण झालंच तर दोन्हीकडच्या सैनिकांनी ताबा रेषेवरून मागे यावं असं निश्चित कऱण्यात आलं आहे. त्यानंतरच्या एका करारात भारत आणि चीन सैनिक आमने सामने आले तर संयम पाळण्याचा तसंच इतर मार्गांचा वापर करावा असं म्हटलं आहे. 

सीमेवर तणाव निर्माण झाला तरी कोणत्याही परिस्थितीत प्रत्यक्ष ताबा रेषेच्या परिसरात गोळीबार किंवा शस्रास्रे वापरू नयेत असंही करारमध्ये नमूद करण्यात आलं आहे. 2013 साली पुन्हा एक करार झाला आहे. त्यावेळी सध्याचे परराष्ट्र मंत्री जयशंकर हे चीनमध्ये भारताचे राजदूत होते. त्या करारात दोन्ही देशांच्या लष्करामध्ये हॉटलाइन तयार करण्यात आली.

सीमेवर तणावाच्या वातावरणात सैनिकांनी मागे येण्यासाठी आणि शस्त्रास्रे वापराबाबत नियम घालून देण्यात आले. यामुळेच कितीही तणाव असला तरी गोळीबार न करता केवळ धक्काबुक्की किंवा दगडफेक केली जाते. याआधी 2017 मध्ये सीमेवर डोकलाम प्रकरणही चिघळले होते. 

काय घडलं गलवान व्हॅलीत?
1975 नंतर पहिल्यांदाच भारत आणि चीनमधील वातावरण इतके उग्र बनले आहे. विशेष म्हणजे सोमवारी झालेल्या संघर्षात एकही गोळी चालवण्यात आली  नव्हती, तरी देखील इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला. चिनी सैनिकांना मागे हटवण्यासाठी भारतीय सैन्याची एक टीम सीमेवर गेली होती. यावेळी चिनी सैनिकांनी त्यांनी भारतीय जवानांवर अचानक हल्ला चढवला. त्यांनी दगड, लोखंडी रॉडने भारतीय जवानांना मारहाण सुरु केली. भारत आणि चीनमध्ये सीमेवर गोळी न चालवण्याचा करार झाल्याने गोळी चालवण्यात आल्या नाहीत. मात्र, दगड-धोंडे, काटेरी तारा गुंडाळलेले लोखंडी रॉड याने दोन्ही बाजूंनी हल्ला चढवण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com