

Tarique Rahman, senior Bangladesh Nationalist Party (BNP) leader and potential Prime Minister candidate
esakal
Tarique Rahman Bangladesh Prime Minister candidate : बांगलादेशचे संभाव्य भावी पंतप्रधान म्हणून ज्यांचं नाव सध्या जगभरात घेतलं जात आहे, ते म्हणजे तारिक रहमान. कारण, तेच आता बांगलादेशचे पंतप्रधान होणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे. शिवाय त्यांनी आधीच सत्ता स्थापनेचा दावाही केलेला आहे. यामुळे बांगलादेशी राजकारणात एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली आहे.
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) ने १३ व्या संसदीय निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला आहे. तर तारिक रहमान हे अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच १७ वर्षांच्या निर्वासनातून लंडनमधून परतलेले आहेत. शेख हसीना यांच्या कार्यकाळात सुनावल्या गेलेल्या शिक्षा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपातून त्यांना मुक्त केले गेले आहे. तर आता मुहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान सत्ता हस्तांतरण करण्याची अपेक्षा आहे. तारीक हे ३६ वर्षांत देशाचे पहिले पुरुष पंतप्रधान बनणार आहेत
तारिक रहमान यांचा आतापर्यंतचा कौटुंबिक अन् राजकीय प्रवास अतशिय रंजक आणि मोठ्या घडामोडींचा राहिलेला आहे. मात्र यापूर्वी त्यांना १७ वर्षांत राजकीय वनवास, तुरुंगवास, छळ आणि कारस्थानांचा सामना करावा लागला आहे. त्यांचा जन्म २० नोव्हेंबर १९६५ रोजी ढाका येथे झाला. त्यांचे वडील झियाउर रहमान हे बीएनपीचे संस्थापक आणि माजी राष्ट्रपती होते, तर त्यांच्या आई खालिदा झिया यांनी तीन वेळा पंतप्रधानपद भूषवलेले आहे.
तारिक यांना लहानपणापासूनच राजकारणात रस होता. १९९० च्या दशकात ते सक्रिय झाले आणि १९९१ मध्ये खालिदा यांच्या पंतप्रधानपदाच्या निवडीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या आई तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर तारिक एक प्रभावशाली नेते बनले. त्यांचे नाव ढाक्यातील हवा भवनशी जोडले गेले, जिथे पक्षाचे निर्णय घेतले जात होते. मात्र, या काळात त्यांच्यावर भ्रष्टाचार, लाचखोरी आणि सत्तेचा गैरवापर असे गंभीर आरोप झाले. विरोधी पक्ष, अवामी लीगने त्यांना ‘डार्क प्रिन्स’ म्हणण्यास सुरुवात केली.
२००६ ते २००७ या काळात बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे लष्कराच्या पाठिंब्याने अंतरिम सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई सुरू केली. मार्च २००७ मध्ये तारिक यांना रात्रीतून अटक करण्यात आली. घोटाळ्यांपासून ते मनी लाँड्रिंग आणि २००४च्या ग्रेनेड हल्ल्यापर्यंत त्यांच्याविरुद्ध तब्बल ८४ खटले दाखल करण्यात आले.
यानंतर सप्टेंबर २००८ मध्ये जामिनावर सुटका झाल्यानंतर, ते वैद्यकीय उपचार घेण्याच्या बहाण्याने त्यांची पत्नी झुबैदा आणि मुलगी झैमा यांच्यासह लंडनला पळून गेले आणि लंडनमधून बीएनपीचे नेतृत्व करत राहिले. त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पक्ष आणि पक्ष कार्यकर्त्यांशी रणनीती आखण्यास सुरुवात केली. एवढंच नाहीतर माजी पंतप्रधान शेख हसीनाच्या १५ वर्षांच्या राजवटीत त्यांना एका प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, ते बांगलादेशला परतत नव्हते.
अखेर ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांच्याविरुद्धच्या विद्यार्थी चळवळीमुळे त्यांना मायदेशी परतण्याची परिस्थिती निर्माण होवू लागली. कारण, निदर्शकांनी अवामी लीगला सत्तेवरून हाकलून लावले आणि शेख हसीना यांना देश सोडून पलायन केले होते. शिवाय, युनूस यांच्या कारकिर्दीत, तारिक यांना न्यायालयाने त्यांच्याविरुद्धचे सर्व प्रलंबित खटले रद्द केल्याने मोठा दिलासा मिळाला होता. अखेर २५ डिसेंबर २०२५ रोजी रोजी त्यांचे ढाका विमानतळावर लाखो समर्थकांनी त्यांचे स्वागत झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.