पत्रकात नमूद केले आहे की, शिवसेना- भाजप एकेकाळचे मित्रपक्ष
दोडामार्ग (सिंधुदुर्ग): शिवसेना भाजपचा आमने-सामने हा जनतेची दिशाभूल करणारा राजकीय स्टंट होता, असा आरोप मनसेचे तालुकाध्यक्ष सुनील गवस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला.
त्यांनी पत्रकात नमूद केले आहे की, शिवसेना- भाजप एकेकाळचे मित्रपक्ष. आजपर्यंतच्या सर्व निवडणुका त्यांनी एकत्र लढवल्या; पण सत्तेच्या स्वार्थापायी भाजपची राष्ट्रवादी पक्षासोबतची पहाटेची युती आणि लगेचच सत्तेसाठी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत केलेली अभद्र युती. त्यामुळे सर्व राज्यातील जनता त्यांना पूर्णपणे ओळखून आहे.
सिंधुदुर्गातील एका व्यासपीठावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे यांची पाठ थोपटतात व नीलेश राणे आपले मित्र असल्याचे सांगतात. मग कार्यकर्त्यांचे आरोप प्रत्यारोप कशासाठी? दोन्ही पक्षाची श्रेयवादासाठी पोकळ लढाई चालली आहे हे सर्वजण जाणतात. केंद्रात भाजप आणि राज्यात शिवसेना मित्र पक्ष असताना खरंतर तुम्ही विकासाची गंगा आणली पाहिजे. ते सोडून एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून जनतेची दिशाभूल करण्यात दोन्ही पक्ष मग्न आहेत.
खरच आज देशाची व महाराष्ट्र राज्याची या दोन्ही पक्षांनी वाट लावून टाकली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर शंभरीपर्यंत पोचले. स्वयंपाक गॅसचे दर हजाराच्या आसपास येऊन ठेपले. केंद्राने गोरगरिबांचे जीवन जगणे नको करून ठेवले. आज लोकांना 'अच्छे दिन' काय असतात ते कळून चुकले. इकडे ठाकरे सरकारने राज्याची वाट लावून ठेवली. कुचकामी आरोग्य यंत्रणा, भरमसाठ विजबिले, रस्त्यांची दुरवस्था, पाण्याचा प्रश्न, पूरस्थिती, जनतेच्या मूलभूत गरजा, वाढती महागाई ह्यामुळे जनता पूर्णपणे कंटाळली आहे.
आज दोडामार्ग तालुक्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आजपर्यंत ज्यांच्यावरती विश्वास ठेवून उमेदवार निवडून दिले तेच आज सत्तेच्या स्वार्थासाठी बदलले व इतर पक्षात गेले. आज त्यांना विचारलं निवडणुकीत तुझं निवडणूक चिन्ह काय होत ? आणि आता तू कुठल्या पक्षात आहेस ? तर काय उतर देतील म्हणे दोडामार्ग तालुक्याच्या विकासाठी पक्ष बदलत आहे. ही ह्यांची नौटंकी जनतेला आता समजली आहे, असे यात नमूद आहे.
तालुक्यात सत्तास्थान असलेल्या दोन्ही पक्ष्यांच्या नेत्यांना माहिती आहे की आता विकास आपल्याकडे होणार नाही. निवडणुका जवळ आलेल्या आहेत. आता सुज्ञ जनतेने त्यांचा डाव ओळखला आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भर चौकात आमनेसामने येऊन प्रसिद्धी मिळवत आहेत. त्यामुळे सुज्ञ जनता राज ठाकरे यांचे नेतृत्व लाभलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे पर्याय म्हणून पाहत आहे, असेही श्री. गवस यांनी म्हटले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.