बीसीसीआयचा आयसीसीशी पंगा; आयपीएल घेणारच...

icc vs bcci.
icc vs bcci.

मुंबई : विश्वकरंडक ट्वेंटी 20 क्रिकेट स्पर्धेचा निर्णय सातत्याने लांबणीवर टाकत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद भारतीय क्रिकेट मंडळाची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, भारतीय क्रिकेट मंडळाने आयसीसीला शह देण्याची तयारी केली आहे. आयपीएलच्या संयोजनात अडथळे आणण्यासाठी आयसीसी विश्वकरंडक ट्वेंटी 20 चा निर्णय लांबवत असल्याचा आक्षेप भारतीय मंडळ घेत आहे.

विश्वकरंडक ट्वेंटी 20 स्पर्धेचे संयोजन 2020 मध्ये अवघड असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलिया सातत्याने सांगत आहे. त्यानंतरही आयसीसी स्पर्धेबाबतचा निर्णय लांबवत आहे. आशियाई क्रिकेट स्पर्धेचा निर्णयही अद्याप न झाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळ नाराज आहे. आशियाई स्पर्धा असताना आयपीएल घेणे योग्य ठरणार नाही, असे पाकिस्तान मंडळाचे मत आहे.

विश्वकरंडक ट्वेंटी 20 स्पर्धेचे संयोजन मूळ कार्यक्रमानुसार घेणे अशक्य असल्याचे आयसीसी पदाधिकारीही जाणतात; मात्र आयपीएलचे संयोजन आमच्यासाठी खडतर होण्यासाठीच ते निर्णय लांबवत आहेत. विश्वकरंडक ट्वेंटी 20 स्पर्धेचे संयोजन सध्याच्या परिस्थितीत अवघड आहे. स्पर्धेत खेळणाऱ्या सोळा संघातील खेळाडूंचे तसेच सपोर्ट स्टाफचे विलगीकरण ऑस्ट्रेलियात अवघड आहे. त्याशिवाय प्रेक्षकांचे विलगीकरणही करावे लागेल. कोरोनाची साथ असताना ऑस्ट्रेलिया एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर परदेशी नागरिकांना स्वीकारण्यास तयार नसेल, असे भारतीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आयपीएलमध्ये खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफ लक्षात घेतल्यास जास्तीत जास्त दीडशे असतात. त्यांचे विलगीकरण करणे विश्वकरंडक ट्वेंटी 20 च्या तुलनेत नक्कीच सोपे असेल. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट मंडळाने स्पर्धेची पूर्वतयारी पडद्यामागे कमालीच्या वेगाने सुरू केली आहे. त्यामुळेच आयपीएल प्रशासकीय समितीचे प्रमुख ब्रिजेश पटेल यांनी स्पर्धा घेण्यास पंधरा दिवस पुरेसे असल्याचे सांगितले आहे. अर्थात भारतातील कोरोनाचे रुग्ण कमी न झाल्यास स्पर्धा संयोजन अवघड होईल, असे मानले जात आहे.

आयपीएल 26 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान?
लांबणीवर पडलेली आयपीएल 26 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान घेण्याचा भारतीय मंडळाचा विचार आहे. या कार्यक्रमाबाबत भारतीय मंडळाने फ्रँचाईज तसेच मीडिया पार्टनर अर्थात स्टार इंडियासह चर्चा केल्याचे समजते. जूनमधील आयसीसीच्या बैठकीत विश्वकरंडक ट्वेंटी 20 स्पर्धेचा निर्णय लांबणीवर पडला; पण त्यानंतर लगेच भारतीय मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह चर्चा करून आयपीएलचा कार्यक्रम तयार करण्यास सुरुवात केली.

स्पर्धा पूर्णपणे दक्षिण भारतात होण्याची चिन्हे
मुंबईत कोरोनाची साथ वाढत असल्यामुळे आयपीएलच्या एक शहरी फॉर्म्युलातून मुंबई बाद झाले आहेत. मुंबईत तीन आंतरराष्ट्रीय स्टेडियम आहेत, त्याचबरोबर पुण्यातील स्टेडियम फार दूर नसल्याने मुंबईला पसंती होती; पण आता त्याऐवजी बंगळूर अथवा चेन्नईचा विचार होत आहे. प्रेक्षकांविना लीग असल्यामुळे लहान स्टेडियमवरही स्पर्धा होऊ शकते. त्याचबरोबर सप्टेंबर ते नोव्हेंबर कालावधीत दक्षिण भारतात पाऊस नसल्यामुळे त्यांना पसंती मिळू शकते. अर्थात त्याच वेळी गुवाहाटी, रांचीचा एकत्रितपणे विचार करून स्पर्धा खेळण्याचाही प्रस्ताव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com