महाराष्ट्राचा जवान नौशेरा सेक्टरमध्ये हुतात्मा

Sangram-Patil
Sangram-Patil

जम्मू - पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती सुरूच असून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेजवळील आणि आंतराष्ट्रीय सीमेवरच्या चौक्यांवर गोळीबार केला आणि त्यात महाराष्ट्राचा जवान हुतात्मा झाला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हवालदार संग्राम शिवाजी पाटील (रा. कोल्हापूर) असे हुतात्मा जवानाचे नाव असून राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील नौशेरा सेक्टरमध्ये पहाटे एकच्या सुमारास झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झाले होते. यावेळी भारताकडून पाकिस्तानला उत्तर देण्यात आले आणि हा गोळीबार दोन्ही बाजूंनी बराच वेळ सुरू होता. यावेळी अन्य जवान जखमी झाला असून त्याला लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हुतात्मा हवालदार संग्राम शिवाजी पाटील हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे गावातील रहिवासी आहेत. यादरम्यान, पाकिस्तानी रेंजर्सनी कथुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार केला. सतपाल, मन्यारी, लडवाल, करोल कृष्णा येथील आघाडीच्या चौक्यांवर पाकिस्तानने काल रात्री दहापासून गोळीबार सुरू केला. यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी उत्तर दिले. हा गोळीबार शनिवारी पहाटे ५.२५ पर्यंत सुरू होता. या गोळीबारात भारतीय बाजूंनी नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले.

तब्बल ३२०० वेळा उल्लंघन
पाकिस्तानकडून अनेक महिन्यांपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून त्यास भारताकडून चोख उत्तरही दिले जात आहे. जानेवारीपासून आतापर्यंत ३२०० पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असून ३० हून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले. तसेच ११० जण जखमी झाले.

जैशे महंमद संघटनेला मदत करणारे दोघे अटकेत
दोन दिवसांपूर्वी लष्कराने धाडसी कारवाई करत चार दहशतवाद्यांचा जम्मू महामार्गावर खातमा केल्याने मोठा डाव उधळून लावला आहे. आता पुलवामा जिल्ह्यात जैशे महंमदच्या दहशतवाद्यांना आणि कारवायात मदत करणाऱ्या दोघांना पकडले आहे. त्यांची ओेळख पटली असून बिलाल अहमद चोपन (रा. वाघड त्राल) आणि मुरसलिन बशिर शेख (छटलाम पॅम्पोर) अशी त्यांची नाव आहे. दोघांना अवंतीपुरा येथे ताब्यात घेतले आहे. पॅम्पोर आणि त्राल भागात शस्त्रपुरवठा आणि दहशतवाद्यांना थारा देण्याचे काम हे दोघे करत होते.

निगवे खालसातील जवानाला वीरमरण
राशिवडे बुद्रूक - राजौरी येथे १६ मराठा पोस्टवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात निगवे खालसा (ता. करवीर) येथील जवान संग्राम शिवाजी पाटील यांना आज पहाटे वीरमरण आले. एकाच आठवड्यात जिल्ह्यातील दोन जवान हुतात्मा झाले आहेत. दरम्यान, निगवे खालसा येथे सकाळी या घटनेची माहिती समजताच गावावर शोककळा पसरली. अमर रहे, अमर रहे, वीर जवान संग्राम पाटील अमर रहे'', पाकिस्तान मुर्दाबाद'' अशा घोषणांनी गावातील प्रमुख चौक दुमदुमून गेले.

संग्राम पाटील १६ मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. गेल्या वर्षी त्यांची १७ वर्षांच्या सेवेची मुदत संपली होती. मात्र, आणखी दोन वर्षे त्यांनी मुदत वाढवून घेतली. ते काही महिन्यांतच निवृत्त होणार होते. ते येत्या १ डिसेंबरला दहा दिवसांच्या सुटीसाठी गावाकडे येणार होते. मात्र, तत्पूर्वीच त्यांना वीरमरण आले. त्यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेची शाळा आणि चनीशेट्टी हायस्कूलमध्ये झाले. आठवीनंतर आजोळी येळवडे (ता. राधानगरी) येथे पुढील शिक्षणासाठी गेले आणि बारावीनंतर सैन्यदलात दाखल होण्यासाठी तयारी सुरू केली. ते २००२ मध्ये सैन्यात दाखल झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे.  निगवे खालसा ग्रामपंचायतीने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून, दिवसभर गावातील चनीशेट्टी हायस्कूलच्या मैदानावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. 

मैदानही गहिवरले...
ज्या मैदानावर संग्राम यांनी मित्रांबरोबर सैन्यात भरती होण्यासाठी सराव केला, त्याच मैदानावर आता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. गावातील १०० हून अधिक तरुण सैन्यात असून, संग्राम गावातील पहिलेच शहीद जवान आहेत. त्यामुळे या मैदानावर घाम गाळणाऱ्या प्रत्येकासह सारे मैदानही गहिवरून गेले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com