IMP NEWS : वंदे भारत अभियानांतर्गत ३४२ औरंगाबादकर परतले; २० प्रवाशांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह 

vande-bharat-mission.jpg
vande-bharat-mission.jpg
Updated on

औरंगाबाद : वंदे भारत अभियानांतर्गत विविध देशात अडकलेले ३४२ प्रवासी औरंगाबादेत आतापर्यंत परतले आहेत. यामध्ये तपासणीनंतर २० प्रवाशांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून भारतात येणारी विमाने मार्च २०२० मध्ये बंद करण्यात आली. त्यामुळे बरेचशे भारतीय परदेशात अडकले. त्या सर्वांना परदेशातून भारतात परतण्यासाठी शासनाच्या वतीने वंदे भारत मिशन चालू करण्यात आले. वंदे भारत अभियान केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.

या अभियानांतर्गत सिंगापूर, दुबई, अमेरिका, न्यूयॉर्क, शारजाह, मस्कत, मॉस्को, लंडन अशा ठिकाणी अडकलेल्या औरंगाबादकरांना परतण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार किशोर देशमुख, नायब तहसीलदार आनंद बोबडे, लखन राठोड यासाठी प्रयत्न करत आहे. 

समन्वय ठेऊन क्वारंटाइन 
परदेशातून आलेला प्रवाशी विमानतळावर उतरल्यावर त्यांना त्यांच्या जिल्ह्यात जाण्यासाठी वाहतूक पास दिले जातात. या पासेस प्राप्त होताच, संबंधित प्रवासी यांना हॉटेल किंवा महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये क्वारंटाईनबाबत विचारणा करण्यात येते. त्यांच्या सोयी, पसंतीनुसार तत्काळ संबंधित हॉटेल किंवा क्वारंटाईन सेंटरच्या नावाने पत्र देण्यात येते. त्याची प्रत लगेचच सबंधित प्रवाशाच्या भ्रमणध्वनीवर उपलब्ध करून देण्यात येते. सातत्याने समन्वय ठेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात येते. 

चोवीस तास सेवा 
परदेशातून येणारी बहुतांश विमाने रात्री उशीरा विमानतळावर येतात. तरीदेखील सबंधित प्रवाशास आवश्यक असणारे पत्र त्यास तत्काळ प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येते. परदेशातून आलेल्या औरंगाबादच्या प्रवाशांना क्वारंटाईन सेंटर किंवा हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी, वैद्यकीय पथकाद्वारे त्यांची तपासणी करण्यात येते. सहाव्या किंवा सातव्या दिवशी संबंधित प्रवाशांच्या लाळेचे नमुने घेण्यात येतात. तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्यास त्यांना सात दिवस गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात येतो. तर कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यास पुढील उपचारासाठी तत्काळ हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात येते. 

काय म्हणाले परतलेले नागरीक 
दुबईतून परतलेल्या टाइम्स कॉलनीतील मोहम्मद हुसेन सय्यद म्हणाले, औरंगाबाद विमानतळावर आल्यानंतर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन केले. आवश्यक असणारी सर्व माहिती उपलब्ध करून सर्वप्रथम क्वारंटाईन होण्याबाबत माहिती दिली. समन्वयातून हॉटेलची सुविधाही उपलब्ध करून दिली. सात दिवस हॉटेलमध्ये आणि नंतर १४ दिवस गृह विलगीकरणात राहिलो, एकंदरितच सर्वांनीच या प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन केले. 
उस्मानपुऱ्यातील मृणाल रुईकर यांना वंदे भारत अभियानांतर्गत भारतात येताना कोणतीही अडचण, समस्या जाणवली नाही. आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया उत्तम आणि जलद पद्धतीने राबविल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सर्वांचे उत्तम सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.

(संपादन-प्रताप अवचार) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com