नऊशे वर्षांपुर्वी असे होते लातूर ! वाचा सविस्तर 

लातुर.jpg
लातुर.jpg

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्यकालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले आहे. त्यातून सुमारे नऊशे वर्षांपूर्वी लातूर नगरीचे समृध्द अध्यात्मिक, बौध्दिक अन व्यापारविषयक नवे पैलू प्रकाशात आले आहेत. पुणे येथील इतिहास संशोधक संस्कृत पंडीत डॉ. श्रीनंद बापट यांनी हे वाचन केले आहे. लातूर जिल्हा इतिहास संकलन संस्थेने इतिहास दिनानिमित्त आयोजित केलेल्या बेबिनारमध्ये डॉ. बापट यांनी हा नव एैतिहासिक खजिना लातुरकरांना उपलब्ध करुन दिला.

शिलालेख हा अस्सल ऐतिहासिक दस्ताऐवज आहे. त्यातून त्या परिसराचा इतिहास भूगोल उजागर होण्यास मोठा हातभार लागतो. नेमक्या याच कारणापोटी इतिहासकार ग. ह. खरे यांनी राज्यातील अनेक शिलालेखांचे १९३४ साली वाचन केले होते. लातूर येथील पापविनाशक मंदिरातील कल्याणी चालुक्य नृपती सोमेश्वर तीसरा याच्या काळातील १० फेब्रुवारी ११२८ चा शिलालेखही त्यास अपवाद राहीला नव्हता. तथापि ग. ह. खरे यांनी केवळ एका बाजुंचे वाचन केले होते. उर्वरीत दोन बाजू तशाच होत्या. त्या वाचल्या जाव्यात यासाठी येथील इतिहास अभ्यासकांनी प्रयत्न केले होते. त्यानुसार पुणे येथील शिलालेख अभ्यासक डॉ. श्रीनंद बापट व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे काम हाती घेतले व ते पूर्णत्वासही नेले.

या शिलालेखानुसार डॉ. बापट यांनी लत्तलौर ही विद्वतजनांची तेजस्वी नगरी असून ५०० विद्वान येथे वास्तव्यास आहेत. प्रजासुख हीत आपली संपत्ती मानणाऱ्या सर्वगुण संपन्न कल्याणी चालुक्य सोमेश्वराची ही नगरी आहे. ज्याच्या दर्शनाने मनुष्यांना पृथ्वीवरच सिध्दी प्राप्त होतात असा पापविनाशन नावाचा देव येथे आहे. माधव नायक नावाच्या ब्राह्मणाने पापविनाशक मंदिर उभारण्यापूर्वी त्या परिसरात निळ्या कमळाप्रमाणे भासणारी विशाल पुष्करणी शंकराच्या कृपने बांधली होती. ती बांधतानातच त्याने तेथे शंकराचे मंदिरही उभारले. केवळ इथेच तो थांबला नाही तर पुजाविधीसाठी लागणाऱ्या साहित्याची तरतुद अन तीच्या उपलब्धतेची जबाबदारीही निश्चित केली होती. 

यानुसार सर्व व्यापाऱ्यांनी वीस कवड्या सोनारांनी सुपे, फळविक्रेत्यांनी दर दुकानामागे एक सुपारी, कापड विक्रेत्यांनी दरमहा चांदीचे नाणे, तेल्यांनी प्रतीपंधरवाडा एक कोडील (एक प्रकारचे माप) तेल, फळविक्रेत्यांनी प्रती दुकान दोन कवड्या, लोणाऱ्यांनी म्हणजेच चुना उत्पादकांनी दररोज एक चांदीचे नाणे द्यावे असा नियम होता. लोणाऱ्याऱ्यावरील सर्वाधिक निधीभार पहाता त्याची मिळकतही मोठ्या प्रमाणात आसावी असे डॉ. बापट म्हणाले. विशेष म्हणजे देणगी देणे सर्वांना बंधनकारक होते व ती न दिल्यास दंडही लावण्यात येत असे. लोणाऱ्यांकडून पैशाच्या तसेच नैवैद्याच्या रुपात तर फळविक्रेत्यांना रुईच्या पानाच्या रुपात दंड वसुल केला जाई, असे डॉ. बापट म्हणाले. 

राज्य दार्शनिका विभागाचे माजी संपादक व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी गणेशवाडी (ता. शिरुर अनंतपाळ) येथील ३० नोव्हेंबर १०९९ शिलालेखावरुन त्या परिसरातील कल्याणी चालुक्य राजवटीच्या तत्कालीन वैभवाची व प्रजाहितार्थ राबवण्यात आलेल्या उपक्रमांची विस्ताराने माहिती दिली. सेनापती भीमनाथाच्या ताब्यात हा परिसर होता. तो कश्मीरचा रहिवाशी होता. त्याने दिलेल्या दानांचे व केलेल्या धर्मकृत्यांचे वर्णन गणेशवाडी शिलालेखातून कळते. त्यान् त्रिपुरुष मंदीरे, शाळा, विहीरी,  तडाग बांधले. यज्ञयाग केले. अन्नसत्रे चालवली. मंदिराला जमिनी दान दिल्या.  तत्पुरुष, वादीरुद्र, क्रियाशक्ती, त्रिलोचनाचार्य पंडीत, श्रीकंठमुनी असे पंडीत येथे रहात होते. त्यांच्या यम, नियम जप अनुष्ठान, मौन समाधी बद्दलही या शिलालेखातून माहिती मिळते. या शिलालेखातील उल्लेखित गावे लातूर जिल्ह्यातील असल्याने हा शिलालेख लातुरच्या इतिहासात महत्वाची भर टाकणारा असल्याचे डॉ. पाठक यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोपात  प्राचार्य डॉ. संजय  ‌वाघमारे यांनी पापविनाशक शिलालेखीत उल्लेखीत ५०० विद्वानांचा संदर्भ लातूर शहरातील पाचशे घर मठाशी आहे का? या पार्श्वभूमिवरही या शिलालेखाचे संशोधन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष डॉ. सदाशिव दंदे यांनी केले. पाहुण्याचा परिचय डॉ. सुनिल पुरी यांनी दिला. सूत्रसंचलन प्रा. माधवी महाके यांनी केले आभार शहाजी पवार यांनी मानले.

हे कार्य व्हावे यासाठी राज्य दर्शनिका विभागाचे सेवानिवृत्त सचिव  डॉ. अरुणचंद्र पाठक,  तत्कालीन महापालिकेचे आयुक्त व सध्याचे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, महापौर विक्रांत गोजमगुंडे, मंदिराचे पुजारी विष्णुदत्त श्रीमाली (व्यास) उर्फ पप्पू महाराज यांचे सहकार्य लाभले. त्याबद्दल संस्थेने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.

(संपादन-प्रताप अवचार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com