प्रणवदांच्या शिक्षणावरील मंथनाने भारावले होते लातूरजन

लातूर ०१.jpg
लातूर ०१.jpg

लातूर : आपल्या शिक्षणपद्धतीत सुधारणा करण्याची गरज आहे. देशाला महासत्ता बनविण्याचे कार्य युवकच करू शकतो. तो सशक्त होणारी शिक्षणपद्धती असली पाहिजे, असे मंथन माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी येथे केले होते. 

लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष २०१३ मध्ये साजरे झाले. त्याच्या समारोप कार्यक्रमाला तत्कालीन राष्ट्रपती मुखर्जी यांनी आवर्जून हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील आदी उपस्थित होते. मराठवाड्यातील गरीब मुलांपर्यंत शिक्षण नेण्याचे काम दयानंद शिक्षण संस्थेने केले आहे, अशा शब्दांत मुखर्जी यांनी संस्थेचा गौरव केला होता.

शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे एक सशक्त साधन आहे. महिलांवर होणारे अत्याचार समाजासाठी चिंतेची बाब आहे. अशा समस्येवर शाळास्तरापासून मातृभूमीवर प्रेम, कर्तव्याप्रति विद्यार्थ्यांत मूल्यांची जोपासना कशी करता येईल, यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. इतिहासात अठराशे वर्षे भारतीय विश्वविद्यालयांच्या विश्वप्रणालीचे प्रभुत्व राहिले आहे; पण आज जगातील सर्वोच्च दोनशे विद्यापीठांत भारतातील एकही विद्यापीठ नाही, याचे चिंतन करण्याची गरज आहे, असे मंथन मुखर्जी यांनी येथे केले होते. 

रत्नापूर, भूकंप आणि दुष्काळ 
यावेळी त्यांनी लातूरचे नाव रत्नापूर, किल्लारीचा भूकंप, लातूरचा दुष्काळ, मराठवाडा मुक्तिसंग्राम याचाही आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला होता. 
 देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘त्या’ आठवणींनी भावना दाटून येतात 
दयानंद शिक्षण संस्थेचा एक जून २०१३ ला सुवर्णमहोत्सव साजरा झाला. यावेळी प्रणव मुखर्जी प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या निधनाने देशाचे अपरिमित नुकसान झाले आहे. ‘गरजूंची सेवा करणे हे माझे ध्येय आहे’, असे म्हणणारे प्रणव मुखर्जी यांची एक हृद्य आठवण आज मनात दाटून येते. 


त्यांनी केलेल्या भाषणाचे काही अंश मला आजही जशास तसे आठवतात, ते म्हणाले होते, की लातूरसारख्या सदैव कोरडा दुष्काळ असणाऱ्या क्षेत्रातही दयानंद शिक्षण संस्थेत पारंपरिक अभ्यासक्रमासोबतच फॅशन ड्रेस डिझाईन, अॅनिमेशन, इंटेरियर डिझाईन यासारखे व्यावसायिक शिक्षणक्रम चालवले जातात. ते निश्चितच समाजासाठी खूप महत्त्वपूर्ण योगदान आहे. शिक्षणाचा प्रमुख उद्देश ‘मानवतेचा विकास करणे’ हे कार्य ही संस्था करते. दयानंद शिक्षण संस्था केवळ शिक्षण देणे एवढेच कार्य करीत नसून माणूस जडण-घडणीत त्यांचे होत असलेले योगदान, ज्ञानदानाबरोबर सामाजिक कर्तव्याची संस्थेची भूमिका याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले होते. आज त्यांनी संस्थेविषयी कौतुकाची थाप आठवली की भावना दाटून येत आहेत. त्यांचे विचार व व्यक्तिमत्त्व कायम स्मरणात राहील. 
- लक्ष्मीरमण लाहोटी, अध्यक्ष, दयानंद शिक्षण संस्था 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com