'महाविकास आघाडीची स्थिती ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी झाली आहे'
कोल्हापूर - जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांचा प्रचंड उन्माद आणि उच्छाद सुरू आहे. त्याला प्रशासनाची साथ आहे. कोणावरही केसेस टाक, कोणालाही आत टाक इथपासून ते राजारामपुरीतील अतिक्रमण कारवाईपर्यंत सर्व काही सुरू आहे. आता धनंजय महाडिक यांना बळ मिळाले आहे. अर्ध्या रात्रीही ते कार्यकर्त्याच्या मदतीला धावून जातील. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा उन्माद आता चालणार नाही. असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला. खासदार महाडिक यांच्याबरोबर त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. (Chandrakant Patil Criticize MVA)
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, की राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान दाखवावे लागते. ही निवडणूक आम्ही जिंकली. विधान परिषदेला तर गुप्त मतदान असते. म्हणूनच मी म्हणालो होतो, ‘ये तो अभी झाकी है, बिस तारीख बाकी है’. महाविकास आघाडीच्या कारभाराला जनताच नव्हे, तर आमदारही त्रासले आहेत. त्यांची कामे होत नाहीत. मंत्री भेटत नाहीत. त्यांची नाराजगी राज्यसभेच्या निवडणुकीतून दिसून आली. महाविकास आघाडीची स्थिती ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी झाली आहे. त्यामुळेच ते आता काहीही आरोप करीत आहेत.
राज्यसभेच्या निवडणुकीचा राज्यातील राजकारणावर मोठा परिणाम झाला आहे. हे बदल आता दिसू लागले. जिल्ह्यातही सत्ताधाऱ्यांनी उन्माद चालवला असून, प्रशासनाची त्यांना साथ आहे. कोणाला उचलून आत टाक, कोणावरही केसेस दाखल कर इथपासून ते राजारामपुरीत दुकानदारांवर जी अतिक्रमणाची कारवाई केली इथपर्यंत सर्व काही सुरू आहे. महाडिकांना आता खासदार म्हणून बळ मिळाले आहे. त्यामुळे आता हा उन्माद चालणार नाही. कार्यकर्त्यांचा मदतीला ते अर्ध्या रात्री धावून जातील.
थांबलेली विकासकामे मार्गी लावणार : महाडिक
या वेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, की राज्यसभेची निवडणूक ही रणनीतीची निवडणूक असते. यात विजय मिळविणे अतिशय कठीण असते. अशा निवडणुकीत पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला निवडून आणले. त्यांचा विश्वास माझ्या कामातून सार्थ ठरवेन.
मी लोकसभेत २०१४ ते १९ खासदार होतो. त्यामुळे त्या कामाचा अनुभव आहे. त्या काळात जी विकासकामे सुरू केली होती, ती थांबलेली आहेत. ही विकासकामे तातडीने पूर्ण कशी होतील, यासाठी प्रयत्न करेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे स्वतःला भाग्यवान समजतो. त्यांच्या माध्यमातून कोल्हापूरचा जास्त विकास करेन.
‘महाविकास आघाडी सत्तेचा दुरुपयोग करते आहे. आमदारांना ते नोकर समजतात. विरोधी पक्षातील आमदारांना रुपयाही निधी देत नाहीत; तर अपक्षांना ३० कोटी देतो, अशा घोषणा करतात. आमदारांना दम देतात. या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार.’
- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.