निपाणी : सीमाप्रश्नासाठी सनदशीर मार्गाने लढा देताना प्रशासकीय यंत्रणेकडून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. राज्यघटनेनुसार सर्व भाषकांना बोलण्याचा अधिकार असूनही दडपशाही केली जात आहे. आतापर्यंत मराठी भाषकांच्या तीन पिढ्या सीमाप्रश्नासाठी बरबाद झाल्या आहेत.
मराठी भाषकांची गेल्या साठ वर्षापासून घुसमट होत आहे. काश्मीर भारतात आले पण कर्नाटक सीमाभाग महाराष्ट्रात का जात नाही. आता सीमाप्रश्नाच्या अखेरच्या लढ्यात युवकांनी झोकून द्यावे, असे आवाहन प्रा. डॉ. अच्युत माने यांनी केले. मंगळवारी (ता. 1) काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषकांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.
व्यासपीठावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे जिल्हाध्यक्ष जयराम मिरजकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष बाबासाहेब खांबे, प्रा. भारत पाटील, प्रा. एन. आय. खोत, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रा. माने म्हणाले, आजतागायत राज्यकर्त्यांनी सीमाप्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. लोकप्रतिनिधींचे सोहळे होत असले तरी कामे मात्र झालेली नाहीत. अलीकडच्या काळात मराठी शाळांना कुलूपे पडत आहेत. त्यामुळे मराठीचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. काळ्या दिनासाठी बेळगावात परवानगी मिळते मग निपाणीत का मिळत नाही. सध्या सर्वत्र भ्रष्ट व्यवस्था सुरू असून त्याला उध्वस्त करण्यासाठी मराठी भाषकांचा लढा आवश्यक आहे.
जयराम मिरजकर म्हणाले, सीमाप्रश्नासाठी लोकशाही मार्गाने लढा सुरूच आहे. तरीही मराठी बांधवावर विविध पद्धतीने अजूनही अन्याय केला जात आहे. काही नेते मंडळी सीमाप्रश्न सुटणार नसल्याच्या अफवा पसरवत आहेत. त्यावर मराठी भाषिकांनी विश्वास ठेवू नये. संयम आणि शांततेने हा लढा सुरूच राहणार आहे.
आता न्यायालयीन लढाई सुरू असून त्यासाठी तरुणांची एकजूट महत्वाची आहे. न्यायालयासह राज्यकर्त्यांना मराठी भाषकांची मागणी डावलता येणार नाही. मुठभर कन्नडीग आपली पोळी भाजून घेत असून त्यांना वेळीच रोखले पाहिजे. केवळ मराठी भाषिकांसाठीच कायदा न वापरता सर्वांसाठी समान कायदा वापरावा.
बाबासाहेब खांबे यांनी, सीमाप्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत संघटना मजबूत असणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमांना नगरसेवकासह लोकप्रतिनिधी हजर राहणे आवश्यक होते. पण त्यांनी नेहमीच दुर्लक्ष केल्याने येत्या निवडणुकीत मराठी भाषकांनी मतदान करताना विचार करण्याची गरज आहे. जानेवारीत होणारा हुतात्मा दिनही मोठ्या प्रमाणात करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास माजी सभापती विश्वास पाटील, किरण कोकरे, रमेश निकम, प्रशांत नाईक, नवनाथ चव्हाण, नंदकुमार कांबळे, सुशांत बुडके, लक्ष्मीकांत पाटील, पप्पू सूर्यवंशी, झुंजार दबडे, अशोक खांडेकर, उमेश भोपे, बाळासाहेब हजारे, सचिन सूर्यवंशी, संतोष पाटील, अवधूत खटावकर, निलेश पावले, शरद मळगे, आशिष मिरजकर, सुनील हिरूगडे, सुधाकर माने, बाबासाहेब मगदूम, जय सूर्यवंशी, उत्तम कामते यांच्यासह मराठी भाषक उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.