जांभूळवाडी : गावाचे गावपण राहणार का?

जांभुळवाडी : दरीपुलाखाली या रस्त्यावर अंत्यविधी करण्यात येतो.
जांभुळवाडी : दरीपुलाखाली या रस्त्यावर अंत्यविधी करण्यात येतो.

पुणे रेल्वे स्टेशनपासून पंधरा किलोमीटर अतंरावर असणाऱ्या जांभुळवाडीचा महापालिकेत समावेश झाला, परंतु प्राथमिक सुविधांचा अभाव असणाऱ्या जांभुळवाडीतील नागरिकांची मात्र समावेशाबाबत काहीशी नकारात्मक भावना आहे. गावात शेतजमिनी, शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याने महापालिकेत गेल्यानंतरही गावाचे गावपण कायम राहावे, अशी नागरिकांची इच्छा आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गावातील स्मशानभूमीची समस्या अत्यंत गंभीर आहे. ग्रामस्थ दरी पुलाखालील एका रस्त्यावरच अंत्यविधी करत असल्याचे विदारक चित्र दिसून येते.

स्मशानभूमीसाठी १० गुंठे जागा ग्रामपंचायतीच्या ताब्यात आली, मात्र त्यासंदर्भात वाद न्यायप्रविष्ट असल्याने स्मशानभूमीचे काम प्रलंबित असल्याने गावातील नागरिकांची कुचंबणा होत आहे. गावाला महसूल दर्जा असला तरी गावठाण दर्जा मिळावा, यासाठी अनेक दिवसांपासून ग्रामस्थांचा पाठपुरावा सुरू आहे.  अनेक ठिकाणी डोंगराचा भाग आहे. या डोंगरावरच ग्रामस्थांनी आपली वस्ती केल्याचे दिसून येत आहे. गावाला आंबेगाव खुर्द पाझर तलावातून पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी गावातील विहीर आणि टाकीद्वारे पुरवले जाते. तो पुरवठा अपुरा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावात कुठल्याही जलशुद्धीकरण प्रकल्पाचे पाणी येत नाही.

गावात सांडपाणी वाहिनी नसल्यामुळे मैलापाणी थेट ओढ्यात सोडल्याचे चित्र आहे. जांभूळवाडी तलाव हे एक प्रसिद्ध ठिकाण असून त्याचीही सध्या दुरवस्था झाली आहे आहे. तलाव परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. महापालिकेची जुनी हद्द संपल्यानंतर गावाकडे जाताना सिमेंट रस्ता असल्याचे दिसून येते. मुख्य रस्ता हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून केला असून सुस्थितीत असला तरी गावातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. गावातील रस्त्यांवर पथदिवे नाहीत. कचऱ्याची समस्या अत्यंत गंभीर असून दरी पुलाखाली कचऱ्याचे ढीग लागल्याचे दिसून येते. गावात निवासी झोन नसल्यामुळे गावातील घरे ही अनधिकृत बांधकामे ठरत आहेत.

दृष्टिक्षेपात गाव...

  • ९९६, सध्या अंदाजे पाच हजार - (२०११ च्या जनगणनेनुसार)
  • ५४८.९८ - हेक्‍टर
  • सरपंच - वनिता जांभळे
  • सदस्यसंख्या - ११
  • पुणे स्टेशनपासून अंतर :  १५ किलोमीटर
  • गावाचे वेगळेपण : प्रसिद्ध जांभूळवाडी तलाव

ग्रामस्थ म्हणतात...
नितीन जांभळे - महापालिका शाश्वत विकास करेल यावर विश्वास नाही. विनाकारण नियमांच्या जाचात अडकून लोकांना त्रास होईल. त्याचबरोबर विकासआराखडा अंतिम टप्प्यात असताना महापालिका समावेशाचा घाट घालून विकासाला खीळ बसेल. 

श्रीकांत लिपाणे - पायाभूत सोयीसुविधा तातडीने मिळाव्यात ही आमची प्रमुख मागणी राहील. त्याचसोबत गावाला गावठाणाचा दर्जा देण्यात यावा.

मदन जांभळे - तीन वर्षापूर्वी जवळच असलेल्या आंबेगावचा महापालिकेत समावेश झाला, त्यानंतर त्या गावाचा काय विकास झाला? याचे उत्तर महापालिकेने द्यावे. त्यानंतर आमच्या गावाच्या समावेशाचा विचार करावा.

तीन वर्षांपूर्वी अकरा गावांचा महापालिकेत समावेश झाला. सध्या त्या गावांची परिस्थिती पाहता आमच्या गावाच्या महापालिका समावेशाला  विरोध आहे. महापालिका समावेशानंतर केवळ करसंकलन होईल, मात्र विकास होणार नाही अशी भीती वाटते. 
- वनिता जांभळे, सरपंच

(उद्याच्या अंकात वाचा होळकरवाडी गावाचा लेखाजोखा)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com