Nandurbar News : जून महिन्यामध्ये पहिला पाऊस पडल्यानंतर हुमणी अळीचे भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतील त्या वेळी कडुनिंब, बोर, बाभळी यांसारख्या झाडाशेजारी प्रकाश सापळे लावून भुंगेरे वेळीच नष्ट केल्यास किडींचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते.
त्यामुळे शेतकऱ्यांनी भुंगेरे नष्ट करण्याची मोहीम मोठ्या स्वरूपात राबविण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. (Control humni worm infestation Appeal to farmers through Agriculture Department Nandurbar News)
खरीप हंगामात ज्वारी, भात, ऊस, तर रब्बी हंगामात गहू, हरभरा इत्यादी पिके घेतली जातात. या पिकांवर हुमणी अळीचा उपद्रव बऱ्याच प्रमाणात होतो. या किडीच्या उपद्रवामुळे सर्वसाधारणपणे ३० ते ८० टक्के नुकसान होते. शाश्वत पाणीपुरवठ्याच्या जमिनीत घेतल्या जाणाऱ्या पिकांमध्ये ओलावा आणि पाणीपुरवठा जास्त होत असल्याने हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे.
भुंगेरा व अळी हुमणीच्या अळीच्या दोन अवस्था असून, भुंगेरा झाडाची पाने खातात, तर अळ्या पिकांची मुळे खातात. अळी अवस्था पिकास अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे पीक वाळून जाते. जास्त प्रदुर्भाव झाल्यास शेतातील संपूर्ण पीक नाश पावते.
वळवाचा पहिला पाऊस चांगला झाल्यास सुप्तावस्थेत असलेले भुंगेरे सूर्यास्तानंतर बाभूळ, कडुनिंब, बोर या झाडांवर गोळा होतात. अगोदर मादी भुंगेरे जमिनीतून बाहेर येतात. त्यापाठोपाठ नर भुंगेरे बाहेर पडतात.
झाडावर बसून ते पाला खातात. झाडावरच नर-मादीचे मिलन होऊन नंतर नर-मादी वेगळे होतात आणि पुन्हा झाडाचा पाला खाऊ लागतात. सूर्योदयापूर्वी थोडा वेळ अगोदर भुंगेरे परत जमिनीत जाऊन लपतात.
भुंगेरे फक्त रात्रीच्या वेळीच जमिनीतून मीलनासाठी बाहेर पडतात. दोन ते तीन दिवसांनी मादी जमिनीत अंडी घालण्यास सुरवात करते. हा नियंत्रणासाठी योग्य कालावधी आहे.
पहिला पाऊस झाल्यावर भुंगेरे सूर्यास्तानंतर बाभूळ, बोर, लिंब या झाडांवर पाने खाण्यासाठी गोळा होतात. अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करावेत व रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून मारावेत. हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरीत्या करावा. त्यामुळे अंडी घालण्यापूर्वीच भुंगेरे नष्ट होतील.
अशी करा उपाययोजना
नैसर्गिकरीत्या वातावरणातील भुंगेरे, किडे प्रकाशाकडे आकर्षित होतात. यास्तव हुमणीचे भुंगेरे आकर्षित करण्यासाठी पिवळा प्रकाश देणारा बल्ब जमिनीपासून सुमारे तीन फूट उंचीवर अडकवून ठेवावा.
बल्ब अडकविण्यासाठी शेतातील उपलब्ध लाकडी काठ्यांचे तिकाटणे करावे. बल्बखाली दोन बाय दोन फूट आकाराचा व एक फूट खोलीचा खड्डा घ्यावा. यामध्ये उपलब्ध प्लॅस्टिक कागद टाकून त्यात अर्धा फूट उंचीचे रॉकेलमिश्रित पाणी भरावे. रात्रीच्या संधिप्रकाशात वातावरणातील भुंगेरे या बल्बकडे आकर्षित होतात.
बल्बखाली साठविलेल्या रॉकेलमिश्रित पाण्यात पडून मरण पावतात. हुमणी नियंत्रणाचा हा साधा, सोपा व कमी खर्चिक आणि अतिशय प्रभावी उपाय असल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.