नवी दिल्ली : लोकसभेत कामकाज सरू असताना बुधवारी(ता.१३) प्रेक्षकांच्या गॅलरीतून सभागृहात घुसून गोंधळ घातलेल्या आरोपींचे नेमके कनेक्शन कुणाशी आहे, हा तपास यंत्रणेसमोरील प्रश्न असून तपास यंत्रणा विविध अंगाने त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणातील आरोपी वेगवेगळ्या राज्यांमधील आहेत, परंतु हे सर्व आरोपी एका समाज माध्यमातील एका समूहातून एकमेकांच्या संपर्कात होते, असे पोलिस तपासातून समोर आले आहे. (Parliament Security Breach what connections of intruders why did the choose this day need to know)
सर्वजण विविध राज्यातले
लोकसभेच्या सभागृहात घुसखोरी करणाऱ्यांपैकी मनोरंजन डी हा कर्नाटकचा, सागर शर्मा हा उत्तर प्रदेशचा आहे. तर संसदेच्या बाहेर घोषणाबाजी करणारी नीलम सिंह ही हरियानाची असून तिच्या बरोबर घोषणाबाजी करणारा अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील आहे.
या चौघांचा हे कृत्य करण्यामागे नेमका उद्देश काय? हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. हे चारही युवक बेरोजगार होते व ते एका चळवळीशी संबंधित आहेत हे मात्र आता स्पष्ट होत आहे. या चौघांच्या मनात देशातील बेरोजगारी व इतर समस्यांबाबत मनात असंतोष खदखदत होता आणि त्यामुळेच त्यांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असले तरी पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
शेतकरी संघटनांशी संबंध
या कृतीमागे नेमकी काय कारणे आहेत याचा तपास पोलिस करत आहेत. हे चौघेही शेतकरी आंदोलनाशी संबंधित आहेत काय याचाही तपास केला जात आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनाने केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागले होते. यावेळी ७५० शेतकरी मरण पावले होते.
या आंदोलनाला या प्रकरणातील नीलम सिंह हिचाही पाठिंबा होता, हे समोर आले आहे. या आंदोलनात प्रामुख्याने पंजाब आणि हरियानातील शेतकरी सहभागी झाले होते. नीलम सिंह ही हरियानाची असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. परंतु शेतकरी नेते राकेश टिकेत या आरोपांचा इन्कार केला आहे. ‘शेतकरी आंदोलन हे शांततेच्या मार्गाने जाणारे असून यात हिंसक कृतीला कुठेही थारा नव्हता’’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
डाव्या चळवळीशी संबंध
हे सर्व युवक बेरोजगार असून डाव्या चळवळीच्या एका गटाशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या दृष्टीने पोलिस संपूर्ण देशात या साखळीचा तपास करीत आहे. या संदर्भात या युवकांच्या फोनवरून कुणाशी संवाद झाले, याची माहिती गोळा केली जात आहे. यातून या युवकांच्या संबंधाची माहिती स्पष्ट होणार आहे.
हाच दिवस का निवडला?
संसदेवरील हल्ल्याच्या स्मरणदिनानिमित्त सुरक्षा व्यवस्थेचा भंग करण्याचे ठरवून शर्मा, मनोरंजन, नीलम आणि शिंदे दिल्लीत पोहोचले आणि गुरुग्राममधील विकी शर्माच्या घराकडे निघाले. बुधवारी सकाळी आरोपींनी संसदेजवळील महादेव मार्ग येथे राहणारे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या कार्यालयातून अभ्यागतांसाठीचे पास मिळविले.
सुरुवातीच्या योजनेनुसार सर्व सहा जण संसदेच्या आत जाणार होते, परंतु फक्त शर्मा आणि मनोरंजन यांनाच पास मिळू शकले. त्यामुळे २२ वर्षांपूर्वी दहशतवादी हल्ल्याचा दिवस मुद्दाम निवडला की केवळ या दिवशी पास मिळाल्यामुळे हे कृत्य केले, याबाबत पोलिस तपास करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.