congress
congress sakal
जळगाव

Raver Loksabha Election : ‘लोकसभेच्या' रावेर वर दावा मजबुतीसाठी काँग्रेसचे हे 3 मुद्दे

सचिन जोशी

Raver Loksabha Election : लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेआधी १९९८ मध्ये तत्कालीन जळगाव लोकसभा मतदारसंघात झालेला विजय, आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही आमदारांसह शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली उभी फूट हे मुद्दे पुढे करत काँग्रेसने आत्ताच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर आपला दावा मजबूत करण्याचे ठरवले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दीर्घ कालावधीनंतर शनिवारी (ता.२८) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात त्यांची बोदवड, अमळनेर येथे सभा होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर श्री. पटोलेंचा हा दौरा असून त्याद्वारे काँग्रेसतर्फे जिल्ह्यातील रावेर लोकसभा व काही विधानसभा मतदारसंघांवर दावा सांगितला जाणार आहे. (3 issues of Congress to strengthen its claim on Lok Sabha Raver jalgaon news)

भाजपचा आहे गड

जिल्ह्यातील आत्ताचे दोन्ही रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे गड आहेत. गेल्या तीन ते साडेतीन दशकांमध्ये या दोन्ही मतदारसंघात अपवाद वगळता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले आहेत.

मतदारसंघांची पुनर्रचना होण्याआधी म्हणजे २००९ पूर्वी तत्कालीन जळगाव (आत्ताचा रावेर) व तत्कालीन एरंडोल (आत्ताचा जळगाव) लोकसभा मतदारसंघात सातत्याने भारतीय जनता पक्षाने प्रतिनिधित्व केले आहे.

१९९८ नंतर इतरांची शिजली नाही डाळ

जळगाव लोकसभा मतदारसंघ १९९० च्या आधी काँग्रेसचा गड होता. मात्र डॉ. गुणवंतराव सरोदे यांनी दोन ‘टर्म' या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९९८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे सरकार कोसळल्यानंतर मध्यावधी निवडणुका झाल्या. तेव्हा डॉ. उल्हास पाटील हे काँग्रेसचे खासदार झाले होते.

मात्र हे सरकार १३ महिन्यांत कोसळले व १९९९ मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या. तेव्हा हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने पुन्हा आपल्याकडे खेचून आणला. तेव्हापासून आत्तापर्यंत या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या व्यतिरिक्त इतर पक्षांची डाळ शिजली नाही.

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या १९९९ मध्ये मूळ परदेशी या मुद्यावरून शरद पवार हे काँग्रेसपासून वेगळे झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. मात्र त्यानंतर ना काँग्रेसचा ना राष्ट्रवादीचा या मतदारसंघात विजय झाला. १९९९, २००४, २००७ (पोटनिवडणूक) २००९, २०१४ व २०१९ अशा पाच निवडणुका झाल्या.

या पाचही निवडणुकांमध्ये अनुक्रमे वाय.जी. महाजन (१९९९ व २००४), हरिभाऊ जावळे (२००७ व २००९), रक्षा खडसे (२०१४ व २०१९) यांनी तेव्हाच्या जळगाव व आत्ताच्या रावेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने १९९९ सह २००९ ला ॲड्. रवींद्र पाटील यांच्या, तर २०१४ मध्ये मनीष जैन यांच्या रूपात उमेदवारी करून पाहिली. पण दोन्हीवेळी राष्ट्रवादी पराभूत झाली. काँग्रेसनेही २०१९ ला डॉ. उल्हास पाटलांना उमेदवारी दिली. पण भाजपने बाजी मारली. त्यामुळे दोन्ही काँग्रेसला १९९९ नंतर या मतदारसंघात विजय मिळवता आला नाही.

आत्ताची स्थिती

आता देश पातळीवर भाजपविरोधात लढण्यासाठी विविध पक्षांनी मोट बांधली असून ‘इंडिया’ आघाडी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपर्यंत ‘इंडिया’ आघाडी टिकून राहिल्यास प्रत्येक मतदारसंघात ‘वन बाय वन’ लढत होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यातील जळगाव व रावेर यांपैकी काँग्रेसने रावेर लोकसभेच्या जागेवर दावा आत्तापासून सांगायला सुरुवात केली.

गेल्यावेळच्या २०१९ च्या सूत्रानुसार ही जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडे राहावी, अशी पदाधिकाऱ्यांची मागणी व आग्रह श्री. पटोलेंकडे असेल. त्यासाठी या मतदारसंघात राष्ट्रवादीचा कधीही विजय झालेला नाही, असे कारण पुढे केले जाण्याची शक्यता आहे. तसेच अजित पवारांनी भाजपशी संधान साधल्यामुळे राष्ट्रवादी दुभंगल्याचे कारणही ‘सपोर्टिव्ह’ म्हणून दिले जाणार असल्याचे काँग्रेस पदाधिकारी सांगत आहेत.

खडसेंना लढण्याचा आग्रह

माजी मंत्री व जिल्ह्यातील वजनदार नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत आल्यानंतर व आत्ताच्या स्थितीत श्री. खडसेंना या मतदारसंघातून लोकसभेच्या उमेदवारीचा आग्रह पक्षश्रेष्ठींकडून सुरू आहे. त्यामुळे श्री. खडसे ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाऊ देतील काय? हा प्रश्‍न आहे. त्यातही शरद पवारांची भूमिका त्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

पटोले समझोता करतील काय?

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जेव्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीत जागावाटपाचे सूत्र ठरले, त्या प्रत्येक वाटाघाटीत काँग्रेसने शरद पवार यांच्यापुढे नरमाईची भूमिका घेतली. आताही तशी शक्यता आहे, असे बोलले जाते. मात्र श्री. पटोलेंची ओळख आक्रमक नेते म्हणून आहे. त्यामुळे रावेरच्या जागेवरून ते राष्ट्रवादीशी ‘समझोता’ करणार नाहीत, असा दावा काँग्रेसतर्फे केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT