जळगाव

पावसाने दडी मारल्याने जळगाव जिल्ह्यात खरीप हंगाम संकटात

सुधाकर पाटील

यंदा वेळेवर अन् भरपूर पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता.


भडगाव : रोज आकाशात ढग येतात, पावसाचे वातावरण तयार होते. मुसळधार पाऊस होईल, असे वाटते. मात्र पाऊसच पडत (Rain Drops) नाही. या पाटशिवणीच्या खेळाने जिल्ह्यातील शेतकरी (Farmers) पंधरा दिवसांपासून पावसाच्या विवंचनेने हवालदिल झाला आहे. मायबाप सरकारने पिके वाचविण्यासाठी कृत्रिम पाऊस (Artificial rain) तरी पाडावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाच्या ४० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांनी माना टाकून दिल्या आहेत. त्यांची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. त्यामुळे खरीप हंगामावर अरिष्ट आल्याने शेतकरीराजा हवालदिल झाला आहे. जूनमध्ये वेळेवर पडलेल्या पावसाच्या भरवशावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र आता दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. जिल्ह्यात जवळपास ९५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

पावसाने फिरवली पाठ
यंदा वेळेवर अन् भरपूर पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दमदार पावसाच्या सलामीने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. त्यानंतरही पावसाने हजेरी लावली. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने पाठ दाखविल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. मात्र अंतिम क्षणी पावसाने हजेरी लावल्याने कशीबसी पिके वाचली. मात्र आता पुन्हा पाऊस ढगाआड लपल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.


कापसाची वाढ खुंटली
जिल्ह्यात ६५ टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात येते. जिल्ह्यात पाच लाख क्षेत्रावर कापूस लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी जवळपास चार लाख ३३ हजार ५११ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. त्यात दोन लाख ११ हजार क्षेत्रावर पूर्वहंगामी म्हणजे बागायती कापसाची लागवड करण्यात करण्यात आली आहे. ती वगळता दोन लाख २४ हजार १७५ हेक्टरवर वरुणराजाच्या भरवशावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. तीच लागवड सध्या पूर्णपणे धोक्यात आली आहे.

७० टक्के पिकांना फटका
जूनमध्ये पडलेल्या पावसावर कापसाबरोबरच, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. सद्यःस्थितीत त्यांना खतांचा डोस देण्यात आला आहे. अंतर्गत मशागतही पूर्णत्वास आली आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने ऐन मोसमात या पिकांना मोठा फटका बसला आहे. जवळपास ७० टक्के पिके वाया जाण्याची शक्यता आहे.

सरासरी अवघा ४० टक्के पाऊस
जूनमध्ये जिल्ह्याच्या सरासरी पावसाच्या तुलनेने अवघा ३० टक्के पाऊस झाला आहे, तर जुलैमध्ये सरासरी १८९.२ मीमी एवढा पाऊस अपेक्षित होता. मात्र अवघा साठ टक्के म्हणजे ११४ मिलिमीटर पाऊस झाला. तर ऑगस्टमध्ये १९६ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे, पण आठवडा उलटला तरी अजून पावसाने तोंडच दाखवलेले नाही.



जिल्ह्यात आतापर्यंत ९५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सद्य:स्थितीत पावसाने दडी मारल्याने पिकांची परिस्थिती नाजूक झाली आहे. पिकांची वाढ खुटंली आहे, पिकांना पावसाची नितांत आवश्यकता आहे.
-संभाजी ठाकूर
जिल्हा कृषी अधीक्षक, जळगाव


जिल्हात पावसाने पाठ फिरविल्यामुळे खरीप हंगामावर संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांनी त्यासंदर्भात कृषी विभागाला सूचना केल्या आहेत. पावसाअभावी जिल्ह्यात ७० टक्के खरीप हंगाम वाया जाण्याची परिस्थिती आहे.
-एस. बी. पाटील
समन्वयक, शेतकरी कृती समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT