पाली : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात सुरू असलेली शिवस्वराज्य यात्रा गुरुवारी (ता.19) रायगड जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी त्यांनी भाजप-शिवसेना या सत्ताधारी पक्षांना लक्ष्य केले.
''शिवसेना-भाजप युती सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. भाजपची महाजनादेश यात्रा आणि शिवसेनेची जन आशीर्वाद यात्रा या केवळ स्वार्थाची जत्रा आहेत. राज्यातील प्रत्येक समाजघटक सरकारवर नाराज आहे. बेरोजगारीसोबत गुन्हेगारीचे प्रमाणही राज्यात वाढले आहे, त्यामुळे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?'' असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी युती सरकारला विचारला.
शिवस्वराज्य यात्रेचे पालीत गुरुवारी (ता.19) जंगी स्वागत करण्यात आले. याठिकाणी आयोजित जाहीर सभेत खासदार डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्र सोडले. पाली येथील शिवस्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार सुनील तटकरे यांनी पुष्पहार अर्पण केला.
ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने, शौर्याने व पराक्रमाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यात शिवस्वराज्य यात्रा पोहोचली आहे. राज्यभरात 65 मतदारसंघात ही यात्रा गेली आहे. सर्वत्र जनतेचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. मागील पाच वर्षात सेना-भाजप सरकारने ज्या पद्धतीने सरकार चालविले, त्याबद्दल जनतेच्या मनात सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे. युवक, माता, भगिनी, शेतकरी वर्ग दु:खी-कष्टी झाला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ग्रामीण भागातील 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. पाच वर्षात 1 लाख 42 हजार कंपन्या बंद पडल्या आहेत. वर्षभरात 983 कारखाने बंद पडले आहेत. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. राज्याचे गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्याच्या नागपुरात प्रचंड गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे या सरकारला कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असं विचारण्याची वेळ आली आहे. असे खा. अमोल कोल्हे म्हणाले.
यावेळी खा. सुनिल तटकरे, आ. अनिकेत तटकरे, आ. धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस माजी रायगड जिल्हाध्यक्ष वसंतराव ओसवाल, जि.प सदस्य सुरेश खैरे, पेण सुधागड मतदारसंघाच्या रा.काँ. अध्यक्षा गीता पालरेचा आदींसह आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
वाकण व कोलाड नाक्यावर देखील शिवस्वराज्य यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमवेत सेल्फी काढण्यासाठी तरुण-तरूणी, आबालवृद्ध व शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. शिवस्वराज्य यात्रेचा समारोप स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर होणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.