औरंगाबाद : गेल्या मंगळवारी (ता. सात) एका दिवसात राज्यात तब्बल ८५ पेक्षा जास्त ठिकाणी ढगफुटी झाली. यात सर्वाधिक म्हणजे ४२ ढगफुटी एकट्या मराठवाड्यात झाली. उर्वरित ढगफुटी महाराष्ट्राच्या अन्य भागात झाली. ढगफुटीचा प्रदेश बनलेल्या महाराष्ट्रात यंदा डिसेंबरपर्यंत पाऊस राहणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ढगफुटी तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी ‘सकाळ’ला दिली.
प्रा. जोहरे यांनी सांगितले, मॉन्सून पॅटर्न बदलला आहे. मॉन्सून बरोबरच चक्रीवादळ, गारपीट तसेच ढगफुटीचा पॅटर्न बदलाने संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे वितरण बदलले आहे. मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असा संपूर्ण महाराष्ट्र आता ढगफुटीच्या ‘हिटलिस्ट’वर आहे. मॉन्सून पॅटर्न बदलामागे मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांच्या वापराने बदललेला बाष्पीभवन दर कारणीभूत आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी करीत सेंद्रिय खतांनी ऑरगॅनिक कार्बन वाढवीत आयुर्मान वाढवत घराघरांत शिरणारा कॅन्सर रोखणे शक्य आहे’’, असे मतही प्रा. जोहरे यांनी केले आहे.
असे झाले नुकसान
यंदा अतिवृष्टीमुळे राज्यात सुमारे १०० लोक मृत्युमुखी पडले. गाय, बैल, म्हशी, शेळ्या मेंढ्या आदी हजारो लहानमोठी जनावरे तसेच लाखो कोंबड्या आदी पाण्यात वाहून गेल्या. इमारती-घरांची पडझड, वाहने, रस्ते, पूल वाहून जाणे यामुळे नुकसान झालेच. परंतु, राष्ट्रीय संपत्तीचेही मोठे नुकसान झाले. महाराष्ट्रातील लाखो एकर शेतीचे क्षेत्र अवघ्या काही मिनिटांत उद्ध्वस्त झाले. त्यामुळे कोरोनाच्या झटक्यातून सावरतानाच भारतीय अर्थव्यवस्था व महागाईचा फटका सामान्य जनतेलाही बसणार आहे.
काय होते ढगफुटीनंतर...
कमी वेळात प्रचंड प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे रस्ता उखडून जातो. मोठमोठे खड्डे पडतात. घरे किंवा भिंती पडतात. लाखो लीटर पाणी आल्याने गाळ जमतो व गाय-बैल-म्हैस अशी मोठी जनावरे, दुचाकी-चारचाकी वाहने तर कधी ट्रकसारखी मोठी वाहनेही पाण्यात वाहून जाऊ शकतात; म्हणूनच अशा पावसाला ढगफुटीला फ्लॅशफ्लड म्हणतात. ढगफुटी होताना पाण्याच्या थेंबांचा आकार वाटण्याच्या आकाराएवढा किंवा त्यापेक्षा मोठा असतो. विजा चमकतात व ढगांचा गडगडाट ऐकू येतो. आकाश पांढऱ्या रंगाचे दिसते. पावसाचे पाणी भुवयांवरून ओघळत अक्षरशः डोळ्यांत जाते व समोरचे दृश्य पाहणेसुद्धा अवघड बनते, अशी माहितीही प्रा. जोहरे यांनी दिली. त्यामुळे ढगफुटीची आगाऊ सूचना देऊन वित्त व जीवितहानी तसेच शेतीचे नुकसान टाळण्यासाठी डॉप्लर रडार मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात औरंगाबाद व नाशिक येथे तातडीने बसविणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.