पुणे : "सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांससंदर्भात निर्णय घेण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना किमान पुरेसा वेळ (रिजनेबल टाईम) दिला आहे. नार्वेकर हे आणखी किती वेळ घेतात, याची सर्वोच्च न्यायालयच वाट पाहत आहे.
न्यायालयाने दिलेल्या निकालास बगल देण्याचे काम केले आहे.'' अशी टिका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करीत "नार्वेकर आमचे जावई आहेत, ते तसे करणार नाही, आमचा त्यांच्यावर विश्वास आहे,' चिमटाही काढला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक गुरुवारी पत्रकार नगर येथील कामायनी सभागृहात बैठक झाली.यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रविंद्र माळवदकर, अंकुश काकडे, ऍड.जयदेव गायकवाड, प्रदीप देशमुख, दिपाली धुमाळ, उदय महाले, ऍड.निलेश निकम आदी उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना बुथ कमिट्या तयार करुन सर्वसामान्यांना जोडण्याबाबत मार्गदर्शन केले.
पाटील म्हणाले, ""देशातील नागरीकांचा भाजपवर किती राग आहे, हे कर्नाटकच्या निवडणुकांमधून स्पष्ट झाले. भाजप आता लोकप्रिय पक्ष राहिलेला नाही. भाजप हा सर्वसामान्यांचा नव्हे, तर धनिकांची पाठराखण करणारा पक्ष म्हणून त्यांची गणना होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. मात्र भाजप निवडणुका लांबवत जाण्याचे काम करीत असून त्यास राष्ट्रवादीला जबाबदार धरत आहे. प्रत्यक्षात, राष्ट्रवादी नव्हे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच निवडणुकांना विलंब होत आहे.''
बुथ कमिट्यांबाबत पाटील म्हणाले, ""बुथ कमिट्या तयार करुन विधानसभानिहाय प्रत्येक वॉर्डामध्ये कमिट्यांच्या बैठका घेण्यास प्राधान्य द्या. त्यामध्ये सर्व नागरीकांना व्यक्त होण्यासाठी संधी द्या. बुथ कमिट्यांवरील काम चांगले असेल, तर निवडणुकांमध्ये फायदा होतो, हे यापुर्वी आपण पाहीले आहे. "एक तास राष्ट्रवादीसाठी' या संकल्पनेला देखील सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याचे काम करा. नागरीकांमध्ये चर्चा, विचार विनीमय होऊ द्या.''
पुण्यात राष्ट्रवादीला पुन्हा संधी
पुण्यात नागरीकांनी भाजपला संधी देऊन पाहिले आहे, आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठी संधी आहे. राष्ट्रवादी महापालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने करेल. महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने निवडून येतील. त्यादृष्टीने तरुणांना, महिलांना चांगला वाव द्या, असेही पाटील यांनी सांगितले.
दल बदलूंना मतदार माफ करत नाहीत
कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या 17 जणांना कर्नाटकच्या निवडणूकीत लोकांनी घरी पाठवले. लोकांना पक्ष, दल बदलु आवडत नाहीत. सत्तेसाठी ज्यांनी पक्ष सोडला, त्यांना जनतेकडून शिक्षा होते, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. निवडणूका केव्हा होतील, याची आता नागरीक वाट पाहत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.