लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोरोनामुळे परीक्षा रद्द केलेल्या भूगोल विषयाला इतर सहा विषयांत पडणाऱ्या लेखी गुणांच्या सरासरीएवढे गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय परीक्षा दिलेल्या तब्बल ७५ टक्के विद्यार्थ्यांना नुकसानीचा ठरणार असल्याची चिन्हे आहेत. गेल्यावर्षीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना पडलेल्या गुणांवरून निष्कर्ष काढण्यात आला असून, त्यावरून मंडळाच्या गुणदानाचा केवळ पंचवीस टक्के विद्यार्थ्यांनाच फायदा होणार असल्याचे दिसत आहे.
पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले
मंडळाच्या वतीने यंदा तीन ते २३ मार्चदरम्यान दहावीची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, कोरोनामुळे २३ मार्च रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत होणारी सामाजिक शास्त्रे पेपर दोन अर्थात भूगोल या विषयाची परीक्षा रद्द करून इतर सहा विषयांच्या लेखी परीक्षेत पडणाऱ्या गुणांच्या सरासरीएवढे गुण देण्याचा निर्णय झाला. मंडळाने २७ मे रोजी घेतलेल्या या निर्णयाचे काही पालकांनी संशोधन केले असून, त्यासाठी गेल्यावर्षी विद्यार्थ्यांना भूगोल सोडून इतर विषयांतील गुणांचा आधार घेतला आहे.
एकूण वीस नमुन्यांतील गुणांवरून मंडळाच्या निर्णयाचा फायदा पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना होऊन ७५ टक्के विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे नुकसान लक्षात घेता सरकारने सर्वसमावेशक फायदा देणारा निर्णय घ्यावा, अशी मागणी विद्यार्थी व पालक करत आहेत.
असा आहे गुणदानाचा फार्म्युला
मंडळाच्या निर्णयानुसार प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान या विषयाला प्रत्येकी ८० पैकी तसेच इतिहासाला ४० पैकी पडणारे एकूण गुण व भूगोल विषयाचे ४० या दोन गुणांचा गुणाकार येणार आहे. या गुणाकाराला ४४० गुणाने भाग घालून येणारे सरासरीचे गुण भूगोल विषयाला मिळणार आहेत. या फार्म्युल्याने भूगोलमध्ये अनेक विद्यार्थ्यांना १५ ते २४ गुण मिळणार आहेत.
सरासरी गुण देण्याच्या कोणत्याही फार्म्युल्याने कोणाचे नुकसान तर कोणाचा फायदा होणार आहे. सर्वांचाच फायदा होईल, असा सर्वसमावेशक फार्म्युला तयार करता येणार नाही. मंडळाने काढलेल्या फार्म्युला हा इतर विषयांत घेतलेल्या गुणांवरून असल्याने समतोल साधणारा आहे.
व्ही. के. खांडके, अध्यक्ष, विभागीय मंडळ, लातूर.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.