देगलूर (जि. नांदेड) : महाराष्ट्रातील १६५ मजूर तेलंगणात मिरची तोडण्यासाठी गेले होते. त्यांच्याजवळील धान्यसाठा संपत आल्याने ते मजल-दरमजल करीत पायीच महाराष्ट्राकडे येत असताना सोमवारी (ता. २७) देगलूर चेक नाक्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
तेथे त्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर परत मजुरांना तेलंगणा प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले. रात्र उलटताच मंगळवारी (ता. २८) त्यातील १०० मजूर पुन्हा महाराष्ट्राकडे निघाले असताना नागराळ चेक नाक्यावर पकडले गेले. जिल्हा प्रशासनाने राज्य सीमाबंदी असल्याने त्यांना येथे ठेवण्यास अनुमती दर्शविली नाही. त्यानंतर प्रशासनाने दोन वाहनांद्वारे त्यांना घेऊन तेलंगणातील मदनूर गाठले. मात्र, तेथील प्रशासनानेही तेथे ठेवण्यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत समर्थता दर्शविली नसल्याने प्रशासन तेथे तळ ठोकून बसले होते.
भोजनाची सोय
ज्या गावात जन्मलो त्या गावात जाण्यासाठी एवढी पायपीट करीत डोक्यावर खंडीभर ओझी वाहत कसेतरी गाव गाठण्याचा प्रयत्न केला; पण येथेही आमच्यासमोर नवे संकट उभे ठाकल्याने आम्ही पूर्णता हतबल झालो आहोत. आमचेही आम्हाला जवळ करत नाही आणि इतरही आमच्याकडे बघत नाहीत तर आम्ही जावे कुठे..? अशी भावनिक साथ परशुराम पवार या मजुरांनी यावेळी घातली. ४२ अंश तापमानात रणरणत दाखवून अंगावर गेल्याने मजुरांची मात्र मोठी फरफट झाल्याचे दिसून आले. या वेळी मात्र माणुसकी दाखवीत नागराळ वाशी यांनी त्यांच्या भोजनाची सोय केली.
लवकर समर्थता दाखविलेली नव्हती
तडखेल तांडा, देवला तांडा, उमरा तांडा, रामपूर तांडा, येथील १६५ मजूर तेलंगणातील खम्ममजवळ मिरची तोडण्याच्या कामासाठी चार महिन्यांपूर्वी गेले होते. अचानक काेराेणाचे संकट उभे ठाकल्याने सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे दुर्गम भागातील शेतात वास्तव्य करणाऱ्या या मजुरांची मोठी कुचंबणा होऊ लागली.
सोमवारी (ता. २७) ते देगलूर चेक पोस्टवर आल्यानंतर प्रशासनाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर त्यांना तेलंगणा प्रशासनाच्या ताब्यात दिले. मात्र, रात्र उलटताच त्यांनी देगलूर तालुक्यात प्रवेश करीत असताना मंगळवारी (ता. २८) नागराळ चेक पोस्टवर पोलिसांच्या तावडीत सापडले.
राज्य सीमाबंदी असल्याने तुम्हाला परत माघारी जावे लागेल, असे सांगूनही त्यांनी तेलंगणात जाण्यास स्पष्ट नकार दर्शविल्यानंतर प्रशासनाने फौजफाटा घेऊन येऊन दोन वाहनांद्वारे त्यांना घेऊन तेलंगणातील मदनूर गाठले. मात्र, तेथेही प्रशासनाने मजुरांना ठेवण्यासंदर्भात लवकर समर्थता दाखविलेली नव्हती. रात्री उशिरापर्यंत येथील प्रशासन तेथे तळ ठोकून होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, तहसीलदार अरविंद बाेळंगे, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरोदे, पोलिस निरीक्षक भगवानराव धबडगे, मरखेलचे सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर, नागराळचे सरपंच बालाजी पाटील, गजानन पाटील नागराळकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष लक्ष्मण ठाणेकर, गोपाळ पाटील, भक्तापूरचे सरपंच विठ्ठल दिवटीवार, तलाठी बेंजलवार, ग्रामसेवक वट्टमवार यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.