सातारा : दोन महिन्यांच्या निर्बंधांनंतर सर्वच उद्योगधंद्यांना श्वास घेण्यास अखेर परवानगी मिळाली. मिळालेल्या सवलतीचा गैरफायदा न घेता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमांचे अत्यंत काटेकोर पालन प्रत्येकाने तेवढ्याच जबाबदारीने करणे आवश्यक आहे. अन्यथा बाजारात नियम न पाळता होणारी गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला नक्कीच निमंत्रण देईल. त्यामुळे सातारकरांनो जरा जपून, कोरोना बसलाय टपून, असे म्हणण्याची वेळ आली आहे. दरम्यान आज (मंगळवार) राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील रस्त्यावरील गर्दी पाहून नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये असे आवाहन सातारकरांना केले आहे. (satara-news-shambhuraj-desai-appeals-citizens-follow-covid19-guideliness)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी गेले ६४ दिवस नागरिकांना निर्बंधांना सामोरे जावे लागले आहे. दुसऱ्या लाटेमध्ये राज्यासह जिल्ह्याची मोठी हानी केली. ती भरून न येणारी आहे. ती नियंत्रणात आली ती केवळ आणि केवळ निर्बंधामुळेच, हेही सध्या कमी होत असलेल्या बाधित व मृत रुग्णांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. आकडेवारी कमी आली म्हणूनच निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
साेमवारपासून सर्व काही सुरू झाले. त्यामुळे वारूळातून मुंग्या निघाव्या तसे लोक बाहेर पडले. खरे तर हे चित्र आशादायक असायला हवे. जीवन हे असेच असायला हवे. कोरोना संसर्गाच्या काळात या स्वातंत्र्याची जाणीव व किंमत प्रत्येकाला होत आहे. परंतु, सवलतीचा गैरफायदा घेऊ नका, असे प्रशासन कानीकपाळी ओरडत असताना दीड वर्ष सर्व परिस्थिती पाहात असलेल्या, निर्बंध सहन करत असलेला नागरिक यातून काही शिकलेच नाहीत का, असा प्रश्न पडावा अशी स्थिती बाजारात निर्माण झाली.
बघेल तिकडे गर्दी...
भाजी मंडईमध्ये पुन्हा गर्दी झाली. एकमेकाला खेटून भाज्यांची खरेदी होत होती. सर्व प्रकारची दुकाने सुरू झाल्यामुळे खरेदीसाठी नागरिकही रस्त्यावर आले होते. त्यामुळे राजपथाबरोबरच, कर्मवीर भाऊराव पाटील पथावरही वाहनांची कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागत होती. दुकाने, बॅंकांमध्ये जाणारे नागरिक हे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नसल्याचे दिसत होते. काही बॅंकांमध्ये नियम पालन करण्यासंदर्भात सूचना दिल्या जात होत्या. तशा उपाययोजना केल्या होत्या. परंतु, नागरिक त्यातूनही नियमांचे पालन करताना दिसत नव्हते. काही शाळांच्या प्रवेशासह इतर कारणांसाठी गर्दी झालेली होती. अंगणवाडी सेविकांची जिल्हा परिषदेजवळ गर्दी होती. शहर पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित असूनही तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन झालेले नव्हते. जिल्ह्यातील विविध गावांतून आलेल्या व कोरोना संसर्ग रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या घटकांकडूनही अशा कृती होत असतील तर, कोरोना रोखला जाणार कसा, असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो.
सावध पावले उचला...
जिल्ह्यातील कोरोना संसर्ग अद्याप संपलेला नाही. दुसऱ्या लाटेच्या उतरतीला अजूनही दररोज ७०० ते ८०० कोरोनाबाधित समोर येत आहेत. त्यामुळे पहिल्या लाटेशी तुलना केल्यास संसर्ग अजूनही मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे. याच परिस्थितीत तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहेत. त्याची दाहकताही अधिक तीव्र असल्याचे सांगितले जात आहे. लहान मुलांनाही अधिक धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे सर्वांसमोर असताना नागरिकांकडून नियमांचे पालन काटेकोरपणे होणे अत्यावश्यक आहे. बाहेर पडताना व वावरताना आपल्या घरातील लहान मुलांचा प्रत्येकाकडून विचार झालाच पाहिजे. अन्यथा, पुन्हा सर्वांवर बेरोजगारीची, आर्थिक संकटांची कुऱ्हाड कोसळू शकते, याचा विचार नागरिकांबरोबरच व्यापाऱ्यांनीही कारायला हवा, अन्यथा कोरोना टपून बसलेलाच आहे.
कोरोना चाचणीवर लक्ष हवे
निर्बंध उठवतानाच सर्व व्यावसायिकांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार काही व्यापाऱ्यांनी आपल्या व कामगारांच्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. परंतु, बहुतांश जणांनी त्याची अंमलबजावणी केलेली दिसत नाही. त्यामुळे कोरोना चाचणीच्या निर्णयाच्या अंमलबजाणवीकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोरोना नियमांचे पालन होते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस व पालिका प्रशासनाने सध्याच्या काळातच प्रभावी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.
दरम्यान गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही सातारा शहरातील गर्दी पाहून चिंता व्यक्त केली. आज (मंगळवार) ते श्री पंचमुखी गणेशाच्या दर्शनास आले हाेते. ते म्हणाले, काेविड 19 बाधितांची संख्या घटत आहे. यामुळेच सातारा जिल्हा अनलाॅक झालेला आहे. सध्या बाजारपेठ दुपारी चार वाजेपर्यंत सुरु असती. ब-याच दिवसांनी बाजारपेठ सुरु झाल्याने नागरिकांची गर्दी हाेत आहे. खरतरं लाेकांची गैरसाेय हाेऊ नये यासाठी निर्बंधातून शिथिलता देण्यात आलेली आहे.
सातारा शहरातील नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे. शिथिलता लाेकांची गैरसाेय हाेऊ नये यासाठी दिलेली आहे. नागरिकांनी गर्दी कमी हाेईल यासाठी प्रयत्न करावेत. आपल्याला तिस-या लाटेपासून बचाव करायचा आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही मंत्री देसाईंनी केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.