नवी दिल्ली : भाषावार प्रांतरचनेनंतर अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र राज्यामध्ये १९६२ च्या लोकसभा निवडणुकीपासून (तिसरी सार्वत्रिक निवडणूक) आतापर्यंत ६३०० हून अधिक उमेदवारांनी अनामत रक्कम गमावली आहे. अर्थातच, यामध्ये अपक्ष उमेदवार सर्वाधिक असले तरी अनामत रक्कम जप्तीचा फटका राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांनाही बसला आहे.
लोकसभा निवडणुकीत उमेदवार मोठ्या प्रमाणात मैदानात उतरतात. विजय एकाचाच होत असला तरी दारूण पराभवही अनेकांचा होत असतो. विशेष म्हणजे अनेकांना आपली अनामत रक्कमही गमवावी लागते. पात्र मतांच्या एक षष्ठमांश मते मिळवणाऱ्यांनाच अनामत रक्कम परत मिळत असते. देशभरात १९५२ पासून आतापर्यंत ७२,२४६ जणांची अनामत जप्त झाली आहे. सुरवातीला लोकसभा निवडणुकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५०० रुपये आणि अनुसूचित जाती जमातीसाठी २५० रुपये असलेली अनामत रक्कम आता अनुक्रमे २५,००० आणि १२,५०० रुपये झाली असली तरी उमेदवारांची संख्याही वाढतच चालली आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत अनामत गमावणाऱ्यांची संख्या ६३०८ वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे १०६५ उमेदवार १९९६ च्या निवडणुकीत होते. तर याच निवडणुकीत राज्यात तब्बल ९४६ जणांनी अनामत गमावली होती. तुलनेत सर्वात कमी म्हणजे १६८ उमेदवार १९६२ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात उभे होते. त्यातील अनामत गमावणारे देखील केवळ ६९ जणच होते. परंतु १९६२, १९६७, १९७१, १९७७ आणि १९९९ च्या निवडणुकीचा अपवाद वगळला तर त्यानंतरच्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांची संख्या आणि सोबतच अनामत गमावणाऱ्यांची संख्याही लक्षणीयरित्या वाढत गेली आहे.
मावळत्या १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत राज्यात ४८ जागांसाठी ८६७ उमेदवार मैदानात होते. त्यातील ७६८ जणांनी अनामत गमावली होती. तत्पूर्वी २०१४ मध्ये मोदी लाटेत महाराष्ट्रातील ८९७ उमेदवारांपैकी ८०० जणांची अनामत जप्त झाली होती. २००९ च्या निवडणुकीतही याच क्रमामध्ये ८१९ उमेदवारांपैकी ७०५ जणांना अनामत रकमेवर पाणी सोडावे लागले. यातुलनेत १४ व्या लोकसभेसाठी २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातील उमेदवारांची संख्या कमी (४१२) होती.त्यामुळे अनामत जप्त झालेल्यांची संख्याही ३१२ एवढीच होती. तर १३ व्या लोकसभेसाठी १९९९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातून २६१ उमेदवार उभे होते.त्यातील १३६ जणांची अनामत गेली. १२ व्या लोकसभेमध्ये (१९९८)देखील अशाच प्रकारे महाराष्ट्रातून ३७७ पैकी २७९ उमेदवारांची अनामत जप्त झाली होती.
१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये तब्बल १०६५ उमेदवार उभे होते. साहजिकच अनामत गमावणाऱ्यांची संख्याही या निवडणुकीत ९४६ वर पोहोचली होती. त्याआधी, दहाव्या लोकसभेसाठी १९९१ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात ८६२ उमेदवारांपैकी ७४८ उमेदवारांची अनामत जप्त झाली होती.
त्याआधीच्या केंद्रीय राजकारणातील अस्थिरतेच्या काळात नवव्या लोकसभेसाठी १९८९ मध्ये झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातून ५९३ उमेदवारांनी नशीब आजमावले होते. तर ४८७ जणांना अनामत गमवावी लागली. तर इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या ४९८ उमेदवारांमध्ये अनामत गमावणाऱ्यांची संख्या ३९९ होती. याच धर्तीवर १९८० मध्ये महाराष्ट्रातून ३११ जणांची अनामत जप्त झाली. यानिवडणुकीत राज्यात ४१५ उमेदवार मैदानात होते. त्याआधी आणीबाणीनंतरच्या १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या सर्वात कमी २११ राहिली. त्यातील ११३ जणांची अनामत जप्त झाली होती.
दरम्यान,१९७१ मध्ये पाचव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये जुन्या मतदार संघ पुनर्रचनेनुसार महाराष्ट्रात ४५ मतदार संघ होते. त्यासाठी २३५ उमेदवार मैदानात उतरले होते. त्यातील अनामत गमावणाऱ्यांची संख्या १४९ राहिली. तर १९६७ मध्ये चौथ्या लोकसभेसाठी महाराष्ट्रात ४५ जागांसाठी मैदानात असलेल्या १८५ उमेदवारांपैकी ८९ जणांना अनामत रक्कम गमवावी लागली.१९६२ मध्ये राज्यात ४४ जागांसाठी १६८ उमेदवार मैदानात होते.त्यापैकी ६९ जणांची अनामत जप्त झाली होती.
महाराष्ट्रातीेल लोकसभा निवडणूक
वर्ष उमेदवार अनामत जप्त झालेल्यांची संख्या
१९६२ १६८ (६९)
१९६७ १८५ (८९)
१९७१ २३६ (१४९)
१९७७ २११ (११३
१९८० ४१५ (३११)
१९८४ ४९८ (३९९)
१९८९ ५९३ (४८७)
१९९१ ८६२ (७४८)
१९९६ १०६५ (९४६)
१९९८ ३७७ (२७९)
१९९९ २६१ (१३६)
२००४ ४१२ (३०९)
२००९ ८१९ (७०५)
२०१४ ८९७ (८००)
२०१९ ८६७ (७६८)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.