'इथल्या पाटामधले पाणी गाते तुझीच गाणी'

manjra dam.jpg
manjra dam.jpg

निलंगा (जि. लातूर) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध खात्याची जबाबदारी पेलली. पाटबंधारे खाते सांभाळताना राज्यामध्ये अनेक मोठ्या प्रकल्पाची उभारणी झाली. दुष्काळाच्या दुष्टचक्रात कायम भरडलेला मराठवाडा व विदर्भातील मोठमोठे प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे तेथे सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या. त्यामुळे निलंगेकर यांच्या काळात अनेक प्रकल्प झाले आहेत. त्यामुळे 'इथल्या पाटांमधले पाणी गातेय तुझीच गाणी' असं म्हणण्याची संधी निमित्ताने मिळाली आहे. 

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याच्या जडणघडणीत, व्यक्तिमत्व साधण्यात कुटुंबाचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. कोणावर वडीलांच्या विचारांची छाप असते तर कोणावर आईच्या विचाराचे संस्कार असतात. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे पाच महिन्याचे असताना त्यांच्या वडिलांचे छत्र हरवले. परंतु आईने मोठ्या जिद्दीने त्यांना शिक्षणाचे धडे दिले. त्यांचे कर्तृत्व, नेतृत्व घडविण्यास आईने दिलेल्या संस्काराची शिदोरी कामी आली.

डॉ. निलंगेकरांचा जन्म झाला तो काळ तसा सामाजिक राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिकूल व तेवढाच संवेदनशील होता. एका बाजूला ब्रिटिशांचे साम्राज्य तर दुसऱ्या बाजूला हैदराबादच्या निजामशाहीची दडपणूक अशा तो प्रतिकूल काळ होता. अशा वातावरणात त्यांची सकारात्मक पद्धतीने जडणघडण झाली.
९ फेब्रुवारी १९३१ रोजी त्यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. स्वातंत्र्यसेनानी म्हणून त्यांना शासनाने गौरवले असले तरी त्यांनी कधीही मानधन स्वीकारले नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी निलंगा येथे सुरुवातीला वकिली व्यवसाय सुरू केला. त्यांच्यावर आर्यसमाजाच्या विचारसरणीचा पगडा होता. निलंगा येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर निजाम राजवट असतानाही त्यांना १९४५-४६ मध्ये पुढील शिक्षणासाठी गुलबर्गा (आताचे कलबुर्गी) येथे जावे लागले. 

तेथील नूतन विद्यालयामध्ये शिक्षण सुरू असताना त्यांच्याकडे संघटनकौशल्य, संयमीपणा, शांत, चिकीत्सक दृष्टीकोण आदी गुणामुळे ते शिक्षकामध्ये प्रिय झाले होते. एक जमीनदार शेतकरी म्हणून त्यांच्या वडीलाचा लौकिक होता. त्या काळात दळणवळणाच्या सुविधा नसल्यामुळे ते घोड्यावर बसून गुलबर्ग्यावरून गावाकडे यायचे. त्या़नी एलएलबीचे शिक्षणही पूर्ण करून वकिली व्यवसायास सुरुवात केली १९४८ मध्ये  मराठी भाषकांचा संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, या मागणीने जोर धरला होता १७ ऑक्टोबर १९४८ रोजी दादरला महाराष्ट्राचे अधिवेशन होते. या अधिवेशनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. 

काँग्रेस पक्षाशी निष्ठावंत
काँग्रेस पक्षाचे विद्यार्थिदशेपासून निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आजही महाराष्ट्राला परिचित आहे. शेतकरी कामगार पक्षाचे (कै.) श्रीपतराव सोळुंके यांच्याविरुद्ध त्यांनी १९५२ यावर्षी पहिली निवडणूक लढविली. मात्र तीथे त्यांचा पराभव झाला. त्यानंतर १९६२ मध्ये त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून निलंगा विधानसभा मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली. देशाच्या तत्कालिन पंतप्रधान (कै.) श्रीमती इंदिरा गांधी यांचे त्यांच्याशी अतिशय निकटचे संबंध होते. काँग्रेसच्या शताब्दी महोत्सवात त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्य केले. गांधी घराण्याच्या निकटच्या संबंधामुळे मंत्रिमंडळात ते सुरुवातीला उपमंत्री म्हणून राहिले. त्यानंतर राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री व थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदे भुषविली.

मुख्यमंत्री असताना मराठवाडा, विदर्भ असा ४२ कलमी विकास कार्यक्रम राबवला होता. शंकरराव चव्हाणांनंतरचे मराठवाड्यातील दुसरे मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख होती. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. औरंगाबाद येथे जवळपास चाळीस एकरमध्ये विमानतळाची उभारणी त्यांच्याच कार्यकाळात झाली. खंडपीठानंतर जिल्हा स्तरावरील जिल्हा न्यायालय, तालुकास्तरावरील न्यायालय, सिंचनाच्या सुविधा असे अनेक विकासकामे त्यांनी केली. शिवाय लातूर व जालना जिल्ह्याच्या निर्मितीही तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले हे मुख्यमंत्री असताना झाली. ती करून घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. 

उजनी, डिंभे, लोअर तेरणा प्रकल्प उभारले 
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी भीमा नदीवरील उजनी येथे मोठा प्रकल्प केला. पुणे जिल्ह्यातील डिंभे प्रकल्प, बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे मध्यम प्रकल्प, तेरणा नदीवरील लोअर तेरणा प्रकल्प, विदर्भातील नदीवर अप्पर वर्धा धरण, लातूर बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा नदीवर धनेगाव येथे धरण, तेरणा व मांजरा नदीवर अनेक ठिकाणी बॅरेजेस अशा अनेक सिंचनाच्या योजना त्यांनी पाटबंधारे मंत्री असताना राबवल्या आहेत.

लोअर तेरणा प्रकल्प करीत असताना सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांना झगडावे लागले. न्यायालयांमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्याची वेळ आली मात्र त्यांनी धरणांची कामे पूर्ण केली. त्यांनी महाराष्ट्रात अनेक मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प, लघुप्रकल्प राबविल्यामुळे त्या भागातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. निलंगा विधानसभा मतदारसंघात अनेक लहानमोठे प्रकल्प त्यांनी उभे करून मतदार संघातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न केला. मसलगा मध्यम प्रकल्प, बडूर मध्यम प्रकल्पांसह विविध लघुप्रकल्प, मांजरा नदीवरील अनेक बॅरेजेस हे त्यांच्या दूरदृष्टी व नेतृत्वाची साक्ष म्हणावे लागेल. त्यामुळे इथल्या लोकांच्या स्मरणात निलंगेकरांचे नाव नक्की राहील.


Edit By Pratap Awachar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com