एकेकाळी जपानमधील टोकियो शहरात पावसाच्या पाण्यामुळे होणाऱ्या नुकसानाचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र त्यावर तोडगा काढत जपानने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यावर उपाय शोधला. त्यामुळे त्यांचे नुकसान हे ९० टक्क्याने कमी झाले आहे असे तेथील अधिकारी सांगतात.
हेच जपानी तंत्रज्ञान महाराष्ट्रातल्या मुंबईला तुंबई होण्यापासून वाचविणारा का? कसे झाले हे प्रयोग? यांची गरज मुंबईत का भासली?
काहीच दिवसांपूर्वी 'मुंबई फर्स्ट' या संस्थेतर्फे 'ग्लोबल कोस्टल सीटीज समिट २०२३' ही आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली, यात अनेक महत्वाच्या बाबींवर प्रकाश टाकण्यात आला.
जपान मधील टोकियो शहर सतत पाण्याखाली का जायचे?
जपान या देशातील टोकियो हे शहर समुद्राजवळ वसलेले आहे. समुद्रसपाटीपासून या शहराची उंची खूप कमी आहे. शहरातील काही ठिकाणी तर समुद्र सपाटीपेक्षा खालचा भूभाग आहे.
त्यामुळेच थोड्याश्या पावसाने देखील सातत्याने हे शहर पाण्याखाली जात होते. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ड्रेनेजची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी पडत होती. त्यातच समुद्रसपाटीपासून उंची नसल्यामुळे पाणी वाहून नेण्यासाठी नसर्गिक जोर पाण्याला मिळत नव्हता. तसेच समुद्राच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने किनारपट्टीजवळील शहरांचा काही भाग पाण्याखाली जात होता. यामुळे जपानचे हजारो कोटींचे नुकसान होत होते.
या सगळ्या गोष्टी होण्यामागे वातावरणीय बदल (क्लायमेट चेंज) हा महत्वाचा मुद्दा होता.
टोकियो ही जपानची राजधानी आहे. त्यामुळेच हे शहर सातत्याने पाण्याखाली जाणे जपानला परवडणारे नव्हते. त्यावर त्यांनी जपानी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे ठरवले.
जपानने सतत येणारे पूर कसे कमी केले?
जपान देशाने यासाठी जमिनीखाली पाण्याची साठवणूक करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. त्यामध्ये पावसामुळे अचानक शहरात तुंबणारे पाणी काही काळासाठी जमिनीच्या खाली साठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी त्यांनी जमिनीखाली मोठे बोगदे तयार केले. या बोगद्यांत पाणी साठविण्याची क्षमता ५९ मिलियन लिटर इतकी होती.
या मोठ्या बोगद्यांना मोठ्या पाईपने जोडले. ज्यावेळी पाण्याचा जोर अधिक असेल त्यावेळी पाण्याचा प्रवाह या बोगद्यात वळवून पाण्याचे प्रेशर कमी केले गेले. आणि आहोटीच्या काळात हे बोगद्यात साठविलेले पाणी समुद्रात सोडले गेले. त्यामुळे पाण्याची पातळी स्थिर राहण्यास मदत झाली असे जपानमधील अधिकारी सांगतात.
हे बोगदे साधारण सहा किलोमीटर लांबआणि ७८ मीटर रुंदीचे आहेत. याला साधारण २ मिलियन डॉलर खर्च आला आहे. हे काम हे जपानने १३ वर्षात पूर्ण केले असून यामुळे आता त्यांच्याकडे पूरस्थिती निर्माण होऊन होणाऱ्या घरांचे नुकसान हे ९० टक्क्यांनी कमी झाले आहे असे जपानी अधिकारी सांगतात.
मोठ्या पावसाने मुंबईची तुंबई का होते?
मुंबई शहराची समुद्रसपाटीपासूनची उंची अनेक ठिकाणी वेगवेगळी आहे. मात्र सरासरी उंची ही साधारण १० ते १५ मीटर आहे. त्यामुळे मुंबईची स्थिती देखील काहीशी टोकियोप्रमाणेच आहे. पावसाच्या पाण्याचा ज्या वेगाने निचरा व्हायला हवा तो मुंबईत देखील होत नसल्याने मुबंईत पूर स्थिती निर्माण होते. आणि पाणी तुंबल्याने रेल्वे, वाहतूक यांच्यावर परिणाम होतो.
हा परिणाम टोकियो शहराएवढा नसला तरी भविष्यात याचे गंभीर परिणाम समोर येऊ शकतात. मुंबईची लोकसंख्या जी आत्ता साधारण २० मिलियन आहे ती भविष्यात ४० मिलियन पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा सहाराच्या मर्यादित साधनांवर ताण येत आहे. त्यामुळे देखील अशी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होताना दिसत असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय परिषदेत देण्यात आली.
मुंबई भविष्यात पाण्याखाली जाणार अशी भीती का व्यक्त केली जाते ?
'क्लायमेन्ट चेंज' मुले केवळ मुंबईची किनारपट्टीचा नाही तर आशियायी देशातील ५५० समुद्रालगतच्या भागावर याचा परिणाम होऊन किनारपट्टी भागाचे नुकसान होऊ शकते अशी भीती परिषदेत तज्ज्ञांनी व्यक्त करण्यात आली आहे.
क्लायमेट चेंज मुळे जागतिक तापमानवाढ आणि त्यातून हिमालयातील बर्फ वितळण्याची जलद होणारी प्रक्रिया यामुळे समुद्रातील जलपातळीत सातत्याने वाढ होते आहे. यामुळे २०५० पर्यंत मुंबई शहराचा काही भाग पाण्याखाली जाऊ शकतो अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबईत जपानी तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी
जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने सध्या मुंबईतील सायन मिलन सबवे, हिंदमाता आणि गांधी मार्केट या तीन ठिकाणी पाण्याचे मोठे बोगदे तयार करण्यात आले आहेत. हिंदमाता आणि गांधी मार्केट हे या वर्षी कार्यान्वित करण्यात आले होते तर सायन हा भाग अजून कार्यान्वित झालेला नाही.
यंदाच्या पावसाळ्यात हिंदमाता येथे पावसाळ्यात मागील वर्षांच्या तुलनेत बराच त्रास कमी झाला. काहींकडून पालिकेच्या कामाचे कौतुकही झाले. मोठा पाऊस पडूनही काहीच वेळात साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. या टाक्यांची पाणी साठवणूक क्षमता २ कोटी ८७ लाख लिटर आहे.
शंभर टक्के नाही पण जपानी तंत्रज्ञानाचा हा प्रयोग बऱ्याच अंशी यशस्वी झाल्याचे मुंबईत पाहायला मिळाल्याने पालिकेने आता आणखीही पाणी साचणाऱ्या भागात हा प्रयोग मोठ्या प्रमाणात करण्याचे ठरविले आहे.
भविष्यात शहरी भागात असे प्रयोग करावेच लागणार ?
याबाबत बोलताना महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे (मित्रा) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी म्हणाले की, "वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाण्याची गरज वाढणार आहे. धरणे बांधून पाण्याची गरज भागविता येणार नाही.
यासाठी पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्याशिवाय आपल्याला सध्या तरी अन्य दुसरा मार्ग मला दिसत नाहीये. हे पाणी जमिनीत साठवून याचा नंतर पिण्याचे पाणी म्हणून उपयोग करता येईल का, याबाबत आमचे काम सुरु आहे."
मुंबईत हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता शहरी भागांमध्ये अनेक ठिकाणी हा प्रयोग होण्याची शकता आहे. जपानी तंत्रज्ञानाचा हा प्रयोग यशस्वी जरी होत असला तरीही याची व्यापकता मर्यादित आहे तसेच हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात खर्च वाढविणारा असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे भविष्यात हा प्रकल्प काही महत्वाच्या आणि मेट्रो सिटी पर्यंतच मर्यादित राहण्याची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.