
सोलापूर : सोशल मीडियामुळे मानसिक आरोग्य धोक्यात येण्याच्या स्थितीकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. सोशल मीडियावर अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक फेसबुक यूजर दिवसातील कमीत कमी एक तास आणि इन्स्टाग्रामवर दीड तास तर व्हॉट्सॲप चॅट, स्टेटस आणि ग्रुपवर तत्त्वज्ञानाचे, शुभेच्छांचे अन् अभिवादनाचे पोस्ट टाकण्यात अख्खा दिवस घालवत असल्याचे दिसून येते.
एवढा वेळ घालवून टाकलेले पोस्ट, स्टेटस, चॅट पाहता ‘कॉमन सेन्स’ मात्र हरविल्याचे ठळकपणे दिसून येते.आपण कर्तृत्वाने बुद्धिमान असल्याचा दाखला देणाऱ्या सुशिक्षित वर्गातील व्यक्तींचे सोशल मीडियावरील पोस्टदेखील हास्यास्पद असल्याचे पाहायला मिळते.
तरीही सोशल मीडियावर भावनाशून्य नाती जोडण्यासाठी सगळेच उत्साही असतात. याचा परिणाम सगळ्याच वयोगटातील वापरकर्त्यांच्या कामावर, अभ्यासावर, वर्तनावर जाणवायला लागला आहे. सोशल मीडियाच्या अतिरेक वापरामध्ये मानवी बुद्धीचा सेन्स मात्र घसरत आहे, हे मात्र खरे.
काय होतात परिणाम?
सोशल मीडियाचा वापर करता आला नाही तर अस्वस्थ होणे, कामावरून लक्ष विचलित होणे. सातत्याने सोशल मीडियावर असण्याने नातेसंबंधांवर, कामावर, अभ्यासावर परिणाम होणे. तंत्रज्ञान आणि आपले सहजीवन सुरळीत ठेवायचे असेल तर सोशल मीडिया आणि आयुष्याचा तोल न सांभाळल्याने अनेक कुटुंबं विभक्त होण्याचे वाढले प्रमाण.
सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या भावनांची देवाण-घेवाण होते. त्यामुळे वेगळीच नाती निर्माण होऊ लागली आहेत. नात्यात आणि भाषेत जरा अधिकचा मोकळेपणा वैवाहिक नाते संपुष्टात आणत आहे.सोशल मीडियामुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे.
मानसिक आरोग्याच्या वाढताहेत तक्रारी
सोशल मीडियाचे व्यसन हा जरी मानसिक आजार मानला जात नसला, तरी इंटरनेट हा व्यसनाचाच एक भाग आहे. सगळ्याच वयोगटांतून सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे मानसोपचार तज्ज्ञांकडे मानसिक आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. यात १० ते १८ वयोगटातील मुलांच्या आणि १८ ते ३० वयोगटातील तरुणांच्या केसेसचे प्रमाण ७० टक्के इतके आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत. तर मानवी संबंधांवरदेखील सोशल मीडियाच्या अमर्याद वापराचे परिणाम जाणवत आहेत. एकीकडे घरातील व्यक्तींमधील संवादाचे प्रमाण कमी झाले आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियाच्या कोणत्या ग्रुपवर कोण काय पोस्ट करत आहे.
कोणी कोणाविषयी, कशाविषयी काय शेअर केले आहे, याकडे सर्वाधिक लक्ष असते. एवढं तासन्तास लक्ष ठेवूनही आपण काय पोस्ट करतो, घटना काय आहे, यावर आपली प्रतिक्रिया देणे योग्य की अयोग्य, याचा विचार न होता केलेल्या पोस्ट या विवेक बुद्धीला न पटणाऱ्याच असतात.
ज्ञान घ्या, मर्यादा ओळखा
सोशल मीडियाद्वारे आपले विचार इतरांपर्यंत पोचवा, परंतु जगाला तत्त्वज्ञान शिकवू नका.इंटरनेट, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपण अपडेट राहा, परंतु आहारी जाऊ नका. सोशल मीडिया आपल्या दैनंदिन कामकाजाचा भाग असला तरी त्याचा वापर कामापुरताच व्हावा.
करमणूक म्हणून सोशल मीडियाचा वापर करत असलात तरी कौटुंबिक नातीही तितक्याच ताकदीने जपता आली पाहिजेत.स्त्री असो की पुरुष, त्यांनी सोशल मीडियावर किती वेळ घालवावा याची मर्यादा ओळखली पाहिजे. अति तेथे अखेर मातीच होणार आहे.
सोशल मीडियाच्या अनिर्बंध वापरामुळे मानसिक आजार
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विवेक राऊत म्हणतात, सोशल मीडियामुळे पौगंडावस्थेतील मुली आणि मुलांवर मोठा परिणाम होतो. सोशल मीडियामुळे जीवनशैली सोपी झाली आहे; परंतु त्याचा वापर सकारात्मक पद्धतीने व्हावा.
वापरावर स्वत:चे नियंत्रण न राहिल्याने एन्झायटी, फोमो, डिप्रेशन, अॅफेक्शन डेफिसिट डिसऑर्डर, नैराश्य, सतत सगळ्यांनी आपल्याकडे लक्ष द्यावे यासाठीची धडपड, आभासी जगात सतत वावर यांसारखे कितीतरी मानसिक आजार सोशल मीडियाच्या अनिर्बंध वापरामुळे होतात.
‘या’ गोष्टी शिकविण्याची गरज नाहीये
एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर मदतीसाठी हात पुढे न येता हेच हात तेथील घटनेचा फोटोशूट करून पोस्ट करण्यासाठी चालतात. एखाद्याचे निधन झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकली जाते, तेव्हा त्या घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता या निधनाच्या पोस्टखाली कोणी वाढदिवसाचे, सण-उत्सवाच्या शुभेच्छांचे मेसेज टाकतात.
एकाच वेळी स्टेटसला एखाद्याच्या निधनाचे, वाढदिवसाचे आणि फिल्मी गाण्याचे पोस्ट सयुक्तिकरीत्या ठेवले जातात. यातून नेमक्या कोणत्या भावना व्यक्त करत आहात?कुटुंब, नातेवाईक अथवा मित्र परिवारामध्ये आर्थिक मदत करताना दहावेळा विचारणा करणारे थेट फेसबुकवरून मैत्री झालेल्या व्यक्तीला लाखो रुपये देऊन फसतात.महिला व पुरुष सोशल मीडियावर आपली मर्यादा ओलांडत असल्याने सोशल मीडिया वापरताना वास्तविक आयुष्यात अनेक प्रश्न उभे राहतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.