देश

कोरोनाची दुसरी लाट अन् भारत

विजय नाईक

कोरोना झंझावातासारखा पसरतोय. तो घरोघरी हजेरी देत आहे. स्थिती भयावह झाली आहे. राजकीय नेते, कुंभमध्ये जमलेले धर्मगुरू व भक्तगण यांना मात्र कोरोनाचे काही देणेघेणे नाही, असे वागत आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं केवळ भारतालाच नव्हे तर जगाला ग्रासलय. अर्धा डझन लसी उपलब्ध असल्या, तरी लसीकरण चालू असूनही कोरोना झंझावातासारखा पसरतोय. तो घरोघरी हजेरी देत आहे. स्थिती भयावह झाली आहे. राजकीय नेते, कुंभमध्ये जमलेले धर्मगुरू व भक्तगण यांना मात्र कोरोनाचे काही देणेघेणे नाही, असे वागत आहेत.

पाच राज्यातून चाललेली प्रचाराची रणधुमाळी, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व अऩ्य राज्यात चाललेल्या प्रचार सभांतून जितका हलगर्जीपणा झाला, त्याची किती किंमत देशाला उचलावी लागेल, याची त्यांनाही कल्पना नाही. त्यांना दिसते ती केवळ मतपेटी. भाजपला तर देश पादाक्रांत करण्याची इतकी घाई झाली आहे, की त्यासाठी ते काहीही करावयास तयार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनानं गाठलंय. तरीही, पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेवर येताच लव्ह जिहादचा कायदा आणला जाईल, अशी घोषणा त्यांनी केलीय. त्यामुळे, अल्पसंख्याक भयग्रस्त झाले नाही, तरच नवल.

राजकीय नेत्याना कोरोना झाल्यास रुग्णालयात प्राधान्य, औषधोपचारात प्राधान्य, व्हेन्टिलेटर्स व प्राणवायू पुरवठ्यातही प्राधान्य मिळत आहे. सामान्याला मात्र रूग्णालयाचे दरवाजे ठोठावूनही वेळेवर औषधोपचार न झाल्याने मरणाला सामोरे जावे लागत आहे. गुजरातमध्ये रुग्णालायाबाहेर तासंतास प्रतीक्षेत उभ्या असलेल्या पन्नासएक रुग्णावाहिन्या, दहनाला येणाऱ्या मृतदेहांची दिसणारी रांग, तर काही राज्यात रुग्णांना पुरण्यासाठी खड्डे खोदून दमलेले लोक दिसत आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी कुंभस्नानासाठी लाखोंना आमंत्रित करण्याऱ्या पानपान भर जाहिराती दिल्लीच्या वृत्तपत्रातून दिल्या. गंगास्नानामुळे कोरोना पळून जाईल, असे अमिष ते देण्यात गुंतले आहेत.

दरम्यान, लाखोंच्या सभांत भाषणे देताना मोदी, शहा, बॅनर्जी आदींनी जनतेला ना सोशल डिस्टंसिंगचे आवाहन केले, की मुखावरण सक्तीचे केल्याशिवाय त्यांना सभेत प्रवेश देऊ नका, असे आदेश पोलिसांना दिले नाही. त्यामुळे या सभा व कुंभमेळ्यात गंगेचे स्नान घेणाऱ्यांना हजारोंनी लागण झाली. साधू संतांना त्याचे काही सोयर सुतक नाही, की त्यांना भक्तांची चिन्ता दिसत नाही. कोरोनाचे संकट कोसळत असताना भक्त भक्षस्थानी ते पडतील, याचे देणेघेणे नाही. लोकही वेड लागल्यासारखे कुंभमध्ये गर्दी करीत आहेत. कोरोनाच्या काळातील कुंभ व कोरोना नसताना झालेले कुंभ यात जमीन अस्मानाचा फऱक आहे, हे न समजण्याइतके लोक भारावूने गेले आहेत काय. कुंभमेळ्याला गेलेले कोरोनाचे भक्त सुपरस्प्रेडर होत आहेत. त्याने गावेच्या गावे कोरोनाग्रस्त होण्याची शक्यता टाळता येत नाही. आधीच्या कुंभमेळ्यांत वेगळ्या प्रकारची ट्रॅजिडी पाहायला मिळायची. तेथे शेकडे भक्तगण चेंगरून अथवा गुदमरून मेल्याच्या घटना घडूनही आपण सुधारलो नाही. निरनिराळ्या सभारंभातून लोकांना करोनाच्या काळात वागायचे कसे, कोणती पथ्य पाळायची, याचे उपदेश पंतप्रधान देतात. त्याची पुनरावृत्ती प्रत्येक सभेपूर्वी ते का करीत नाहीत. हे पाहिले, की मतांचे राजकारण हेच कसे सर्वोच्च आहे, याची खात्री पटते.

परिस्थिती अशी झाली आहे, की दृकश्राव्य माध्यमे, वृत्तपत्रे यातून तीच ती चर्चा, त्याबरोबर वाढणारी रूग्णांची संख्या, टाळेबंदीची टांगती तलवार, रोज बदलणारे नियम, रुग्णालयांची कमतरता, विमान वाहतुकीबाबत अनिश्चितता, पर्यटनाला बसलेला फटका, घरात डांबून राहाण्याचे कम्पल्शन, शालेय परिक्षांबाबत बदलणारे निर्णय, शिक्षणबाबत विद्यार्थी व शिक्षणसंस्थांपुढे रोज निर्माण होणारे प्रश्न, गेल्या वर्षी कोरोनामुळे शहरात आलेल्या कोटयांवधी कामगारांचे अत्यंत कष्टदायक असे घराकडे परतणे, पुन्हा शहरांक़डे परतणे व आता पुन्हा घराकडे परतणे, हे चित्र सामाजिक वाताहातीचे आहे. यातील आश्चर्यांची बाब म्हणजे, गेल्या वर्षी याच काळात अब्जाधिशांची वाढलेली व वाढणारी संपत्ती. कोरोनाविरूद्ध लस व अऩ्य उपचार साहित्य बनविणाऱ्या कंपन्यांना कोट्यावधी रूपयांचा नफा होतोय व पुढील काळात होत राहणार. लसींची होणारी चोरी, त्याचा काळाबाजार, रेमिडिसीवीरचा सुरू झालेला काळाबाजार व काही ठिकाणी त्याची अव्वाच्या सव्वा वाढलेली लाख भर किंमत, म्हणजे आम जनतेला वेठीला धरण्यासाऱखे आहे. त्याविरूद्ध सरकारची यंत्रणा तोकडी पडली आहे. उलट, विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सरकार हाती असलेली पोलीस व अऩ्य यंत्रणा यांचा राजरोसपणे वापर करताना दिसते.

आताचा कोरोना आता अधिक धोकादायक बनलाय, तो त्यातील निरनिराळ्या नव्या प्रकारच्या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे. ज्यांनी कोव्हॅक्सीन व कोव्हिशील्डची लस घेतली, त्यातील काहींनाही कोरोनाने सोडले नाही. त्यांनाही कोरोना झाला. प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, कालपर्यंत कोविडचे पहिले लसीकरण करणाऱ्यांची एकूण संख्या 12.25 कोटी झाली असून, त्यापैकी 1.6 कोटी लोकांना दुसऱ्यांदा लस मिळाली. भारताला सव्वा अब्ज लोकसंख्येच्या लसीकरणाचे उद्दिष्ट साधायचे आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, भारतामध्ये कोरोना वेगाने पसरत असून, त्याच्या वाढीचे प्रमाण 7.6 टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. 2020 मध्ये हेच प्रमाण 5.5 टक्के होते. सरकारचा ही माहिती एकीकडे व तिला आव्हान देणारी सरकारीच माहिती पुढील प्रमाणे.

निकेइ एशियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आयुष्यमान भारत, या सरकारी आरोग्य विमा उपक्रमाच्या प्रमुख इंदू भूषण यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते, की कोरोनाची साथ ही लेल्फ लिमिटिंग म्हणजे स्वतःहून सीमित होणारी आहे. तिच्या प्रजननाचे प्रमाण एकापेक्षाही खाली गेले आहे. तर, देशाला कोविद लसींची निर्मिती करण्यासाठी अर्थसाह्य देण्याची गरज काय. अऩेकाना असे वाटले, की भारताने कोरोनाविरूद्ध सामुहिक कवच (हर्ड इम्युनिटी) मिळविले आहे.

इंदू भूषण यांचा दावा आता सपशेल कोलमडून पडला आहे. उलट प्राणवायूच्या पुरवठ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, गुजरात आदी राज्यांची उलघाल सुरू झालीय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्राणवायूच्या पुरवठ्याची मागणी करण्यासाठी पंतप्रधानांना केलेल्या दूरद्ध्वनिला काही प्रतिसाद मिळाला नाही. कर्नाटकात प्राणवायूची मागणी तिप्पट झालीय. तिथं दिवसाकाठी 200 मे.टन. ची गरज आहे. काही रुग्णालयातून प्राणवायूचे प्रमाण शून्यावर पोहोचले आहे. 18 एप्रिल रोजी दिल्लीत कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या 24 हजार, 375 व त्याच दिवशी झालेल्या मृतांची संख्या 167 झाली. गुजरात, केरळ, कर्नाटक, तेलंगण, तामिळ नाडू या राज्यातही रुग्णांची संख्या सामाजिक भयगंड वाढविणारी आहे. त्याविरूद्ध कितीही कंबर कसून उभे राहिले, तरी प्रयत्न कमी पडत आहेत. दुसरी लाट ही एप्रिलच्या अखेरपर्यंत शिगेस पोहोचेल व त्यानंतर आलेख खाली येईल, हा अंदाज खरा ठरणार काय.

दिलासा देणारी बाब म्हणजे पंतप्रधानांनी आवाहन केल्यावर हरिद्वारच्या महाकुंभ मेळ्यात भाग घेणाऱ्या 13 पंथांपैकी एका पंथाचे प्रमुख अवधेशानंद गिरी यांनी आपल्या पंथाचा पाय काढता घेतला. 30 एप्रिल पर्यंत चालणाऱ्या कुंभमेळ्यातून आणखी दोन आखाड्यांनी माघार घेतल्याचे वृत्त आले. परंतु, याच पंथ वा आखाड्यातील भक्तांनी आधीपासून कुंभमेळ्यात भाग घेतल्याने त्यातील किती जणांना लागण झालीय व ते किती लोकांना कोरोनाची लागण करणार, याचा काही अंदाज नाही. त्यामुळे दिवसरात्र सावधानता व कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन, एवढाच उपाय उरला आहे. महाराष्ट्रात पुणे व अऩ्य शहरातून पुढे येणारे आकडे शहारे आणणारे आहेत. लॉकडाऊन हे नवे नॉर्मल ठरण्याची शक्यता आहे. यावेळी, देश भगवान भरोसे आहे, असे वाटले, तर ते चुकीचे आहे, असं कुणाला वाटणार. या आधी आपण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वाक्यावर विश्वास ठेवला होताच. पेट्रोल व डिझेलच्या किमती का वाढताहेत, असं जेव्हा देश विचारीत होता, तेव्हा त्या म्हणाल्या, परमेश्वरालाच ठाऊक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT