नवी दिल्ली : महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. 'पुलवामाच्या हल्ल्यातून हे सरकार काहीही धडा शिकलेले नाही आणि नुसत्याच बड्या बाता मारत बसले', अशी टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी केली.
नक्षलवाद्यांनी आज (बुधवार) गडचिरोलीमध्ये हल्ला केला. यात १५ जवान हुतात्मा झाले. 'या हल्ल्याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी आणि भविष्यात असे हल्ले रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जावी', अशी मागणीही पटेल यांनी केली.
या भीषण हल्ल्यापूर्वी माओवाद्यांनी २५ वाहने जाळून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शीघ्र कृती दलाच्या सी-६० कमांडो पथकावर केलेल्या बॉम्बहल्ल्यात १५ जवान हुतात्मा झाले.
यासंदर्भात पटेल म्हणाले, ''पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी आपल्या जवानांच्या पथकावर हल्ला केला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सरकारने फक्त बड्या बड्या बाता मारल्या; पण काहीही धडा शिकला नाही. आजची घटना म्हणजे राज्य आणि केंद्र सरकारसाठी धोक्याची घंटा आहे.'' पुलवामा येथे फेब्रुवारीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान हुतात्मा झाले होते. तो हल्ला 'जैश ए महंमद'च्या दहशतवाद्यांनी केला होता.
'गेल्या पाच वर्षांत देशामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ३९० हून अधिक जवान हुतात्मा झाले. भारताला अधिक सुरक्षित करण्याचे मोदी सरकारचे दावे किती पोकळ आहेत, हेच यातून दिसते', अशी टीका कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली.
नक्षलवाद्यांवर आता कडक कारवाई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकेतhttps://www.esakal.com/desh/perpetrators-naxal-attack-gadchiroli-will-not-be-spared-says-pm-narendra-modi-186658
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.