kedarnath chardham
kedarnath chardham esakal
साप्ताहिक

Chardham Yatra Darshan: कशी करावी चार धाम यात्रा? कैलासपती महादेवाच्या साक्षात्काराचा आध्यात्मिक प्रवास

साप्ताहिक टीम

संदीप देशमुख

चार धाम यात्रा ही एक आध्यात्मिक प्रवास आणि वेगळा असा देवदर्शनाचा अलौकिक अनुभव वारसा ठरतो. उत्तराखंडमधील चार धाम म्हणजे यमुनोत्री - गंगोत्री - केदारनाथ - बद्रीनाथ. ही यात्रा जितकी अवघड आहे, तितकीच ती लाभदायकपण आहे, असे मला वाटते.

हे चारही धाम हिमालयाच्या कुशीत असल्याने तिथे हवेमध्ये विलक्षण गारवा असतो. चार धाम यात्रेची सुरुवात आणि सांगता हरिद्वारपासून होते. हरिद्वार म्हणजे हरीचे द्वार. हर की पौडी येथे गंगा आरती केली जाते. पौडी म्हणजे प्रवेशद्वार.

या ठिकाणी संध्याकाळची गंगा आरती असते. गंगा आरतीचे ते दृश्य पाहून गंगेबद्दलची कृतज्ञता मनावर खोलवर स्पर्श करून जाते. त्यानंतर आपला प्रवास सुरू होतो तो पहिले धाम यमुनोत्रीकडे.

इथे जाण्या-येण्यासाठीचा संपूर्ण दहा किलोमीटरचा प्रवास आहे. हा प्रवास पायीसुद्धा करता येतो, आणि घोडा, डोली इत्यादी साधनेसुद्धा उपलब्ध आहेत.

यमुनोत्रीला येणाऱ्या व्हीआयपी व्यक्तींनासुद्धा घोडा किंवा पालखीचाच पर्याय स्वीकारावा लागतो, इथे अन्य पर्याय नाहीत. यमुनोत्री मंदिराच्या बाजूला सूर्यकुंड आहे. तिथे तांदूळ शिजवून तो प्रसाद म्हणून वाटला जातो.

यानंतरचे धाम गंगोत्री! भगीरथ राजाने महादेवाची तपश्चर्या करून महादेवांना प्रसन्न केले आणि स्वर्गातून वाहणाऱ्या गंगा नदीला पृथ्वीवर आणले, अशी कथा आहे. चार धाम यात्रा करणारी व्यक्ती जेव्हा गंगेचे पाणी आणून विधीवत पूजा करते, तेव्हा ही यात्रा सफल झाली, असे मानले जाते.

उत्तरकाशीला मुक्कामी असताना आवर्जून काशी विश्वनाथ मंदिराला भेट द्यावी. हे गंगेच्या किनाऱ्यावर असलेले महादेवाचे मंदिर फार सुंदर आहे.

ह्या मंदिराच्या दारामध्ये एक त्रिशूळ आहे. हे त्रिशूळ पार्वतीमातेने स्वर्गातून राक्षसाचा वध करण्यासाठी पृथ्वीवर फेकले आणि ते ह्या ठिकाणी पडले, असे सांगितले जाते.

त्यानंतर आपण प्रस्थान करतो तिसऱ्या धामसाठी केदारनाथसाठी! केदारनाथला जाताना वाटेत टिहरी डॅम हे उत्तराखंडमधील सर्वात मोठे धरण लागते. केदारनाथच्या अलीकडे मुक्कामी फाटा हे असे एकमेव ठिकाण आहे, जिथे हेलिकॉप्टरने येणाऱ्या यात्रेकरूंना उतरता येते.

मुक्कामी फाटा येथे बऱ्याच कंपन्यांची हेलिपॅड आहेत. तिथून मग पुढचा प्रवास सुरू होतो. गौरीकुंडापासून येणाऱ्यांना जाऊन-येऊन साधारण छत्तीस किलोमीटर अंतर पार करावे लागते.

काहीजण पायीच येतात, तर काहीजण घोडा किंवा पालखीने. हे धाम अद्‍भुत आहे असे म्हणावेसे वाटते. असे का म्हणतोय, याची प्रचिती तिथे गेल्यानंतरच येते.

चालत जाताना अतिशय थकवा येतो. एक पायही आता उचलत नाहीये, अशी अवस्था होते. पण केदारनाथाचे दर्शन झाले, की संपूर्ण थकवा आपोआप निघून जातो.

महादेवाचे दर्शन घेऊन आणि तिथला संपूर्ण परिसर पाहून मन अगदी भारावून जाते. वाटते की साक्षात कैलासपती महादेव यांचा साक्षात्कार झाला.

टूरमधील एक किस्सा सांगतो. ऐंशी वर्षांपुढील काही आजी-आजोबा चार धाम यात्रेला आमच्या सोबत होते. आपले कसे होणार असा विचार करून त्यांना फार टेन्शन आले होते. कारण खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर रद्द झाले होते.

चालणे शक्य नाही. आम्ही त्यांना धीर दिला. सांगितले, घाबरू नका. तुम्हाला दर्शन होणार. त्यांना घोड्यावर बसवून केदारनाथकडे पाठवले. ते दर्शन करून पुन्हा माघारी आले तेव्हा समाधानी दिसत होते. त्यांनी धन्यवाद दिले तेव्हा त्यांना सांगितले, की कर्ता करविता तो कैलासपती आहे.

त्याच्यावर सोपवून द्यायचे. तो आपोआप आपल्या भक्ताला दर्शन घडवून आणतो. केदारनाथ दर्शन करून येणारा प्रत्येक यात्रेकरू फार आनंदी आणि समाधानी वाटतो.

कारण जाताना वाटणारी भीती, दर्शन झाले की दूर होते. येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूचा हसरा चेहरा पाहून समाधान वाटते.

केदारनाथनंतर आपले प्रस्थान असते, बद्री विशाल - बद्रीनाथला. येथे पार्किंगपर्यंत गाडी जाते. फार काही चालावे लागत नाही. इथल्या माना या गावात व्यास ऋषींनी महाभारत रचले, असे म्हटले जाते.

व्यास ऋषी सांगत असलेले महाभारत श्रीगणपती लिहून घेत असताना सरस्वती नदीच्या प्रवाहाचा प्रचंड आवाज येत होता. श्रीगणपतीला त्यामुळे लिहिताना व्यत्यय येत होता. त्यांनी सरस्वती नदीला दोन-तीन वेळा सांगितले, की तू आवाज करू नको.

माझ्या लिहिण्यामध्ये व्यत्यय येतोय. तिने ते काही ऐकले नाही. त्यामुळे गणपतीने क्रोधीत होऊन तिला तू कुठेच दिसणार नाहीस, लुप्त होशील, असा शाप दिला, अशी कथा सांगितली जाते.

माना या गावानंतर नदी पुढे कुठे जाते कळत नाही. गणपतीने नंतर सरस्वतीला उःशाप दिला, की तू जिथे दिसशील तिथे तुझा संगम झालेला असेल. प्रयागराजला गंगा-यमुना-सरस्वतीचा त्रिवेणी संगम आहे. तिथे जाण्यासाठी नावेतून जावे लागते. कारण गंगेचे पात्र फार मोठे आहे.

संगमावर मात्र फक्त गुडघाभर पाणी आहे. असेही म्हटले जाते, की पांडव याच माना गावामधून स्वर्गात गेले. भिमाने याच सरस्वती नदीला जाण्यासाठी वाट देण्याची विनंती केली होती. पण तिने काही ती मान्य केली नाही.

त्यावेळेस भिमाने प्रचंड मोठी शिळा नदीवर टाकली आणि त्यावाटेने ते स्वर्गात गेले. आज ही शिळा भीमपूल म्हणून ओळखली जाते.

चारही धामच्या दर्शनानंतर परतीचा प्रवास सुरू होतो. हरिद्वारकडे परतताना वाटेत येताना धारीदेवीचे दर्शन घेतात.

ही देवी चार धामची रक्षण-ऊर्जा म्हणून संबोधली जाते. रात्रीचा मुक्काम करून हरिद्वारमध्येच चार धाम यात्रेची सांगता होते.

उत्तराखंडमधील चार धामच्या वाटेवर निसर्ग सौंदर्याचा अलौकिक खजिना आहे. कर्णप्रयाग, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, अलकनंदा आणि भागीरथी नद्यांचा संगम अशा ठिकाणी अनुभवायला मिळणाऱ्या निसर्ग सौंदर्यामुळे चार धाम यात्रा अधिकच सुफळ संपूर्ण होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT