Saptarang
Saptarang esakal
सप्तरंग

शायरीतील वेदांत!

- डॉ. नीरज देव

मानवी जीवनात एक काळ असा येतो, की त्याला मरणाची वाट पाहावी लागते. शायराला वाटते, मरणाने अशावेळी यावे की त्याला या बसा! म्हणत त्याचे स्वागत करण्याचे त्राण आपल्यात हवे. अचानक व्यथित होऊन तो म्हणतो, की ‘मृत्यो, मी मरायच्या आधी तू ये! नाहीतर माझा मृतदेहच तुला न्यावा लागेल.’ खरंतर मृत्यूने प्राणहरण केल्यावरच देहाचा मृतदेह बनतो, पण कवी येथे त्यावरही व्यंग करतो. त्याला वाटते मृत्यूला केवळ मेलेली माणसेच दिसतात. जिवंत माणूस, त्याची कला त्याला दिसत नाही. (saptarang latest marathi artcle on marathi poetry Vedanta in Shayari by dr neeraj deo nashik news)

रसिका! भाऊसाहेब पाटणकरांच्या मराठी शायरीचे महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात वारेमाप भरलेली दार्शनिकता हेच होय. या दार्शनिकतेचा आधार वैदिक तत्त्वज्ञान आहे. मात्रं त्यातही धक्कातंत्र नि मिश्किलतेची छटा कवी कोठेही सोडीत नाही. मृत्यूला तो घाबरत नाही. कारण तो त्याच्या जन्मोजन्मीच्या परिचयाचा आहे. प्रत्येक जन्मात तो त्याला भेटलेला आहे.

ऐसे नव्हे मृत्यूस आम्ही, केंव्हाच नाही पाहिले
खूप आहे पाहिले त्या, प्रत्येक जन्मी पाहिले
मारीले आहे अम्हीही, मृत्यूस या प्रत्येकदा
नुसतेच ना मेलो अम्ही, जन्मलो प्रत्येकदा

कवीचे हे प्रतिपादन गीतेच्या ‘वासांसि जीर्णानि यथा विहाय’ सिद्धांताचे पुनर्प्रतिपादनच आहे. ‘मृत्यो सर्वहरश्चाहम्’चे अर्थात, मृत्यू दारिद्र्य, दैन्य, दुःख, व्यथा, वेदना, विकार साऱ्यांचेच हरण करतो हे सूत्र कवीला माहीत आहे म्हणून तो मृत्यू येऊ नये, या मताचा पुरस्कार न करता कधी कधी तो मृत्यूचे स्वागत करायला तयार होतो. एका ठिकाणी तो म्हणतो,

मृत्यो, अरे, तूं का कुणाला येऊ नयेसा वाटतो
येतो असाही काळ जेंव्हा, तूच यावा वाटतो

होय, मानवी जीवनात एक काळ असा येतो, की मरणाची वाट पाहावी लागते. शायराला वाटते मरणाने अशावेळी यावे की त्याला या बसा! म्हणत त्याचे स्वागत करण्याचे त्राण आपल्यात हवे. अचानक व्यथित होऊन तो म्हणतो, की ‘मृत्यो, मी मरायच्या आधी तू ये! नाहीतर माझा मृतदेह तुला न्यावा लागेल.’

खरंतर मृत्यूने प्राण हरण केल्यावरच देहाचा मृतदेह बनतो, पण कवी येथे त्यावरही व्यंग करतो. त्याला वाटते मृत्यूला केवळ मेलेली माणसेच दिसतात. जिवंत माणूस, त्याची कला त्याला दिसत नाही, तेव्हा तो आंतरिक तळमळीने म्हणतो,

मृत्यो, अरे येतास जर का, थोडा असा आधी तरी
ऐकून जातास तूही, शेर एखादा तरी

कवीच्या शायरीला प्रश्न पडतो, की कवीचा मृत्यू झाल्यावर आपले काय होणार, तेव्हा शायरीच्या अमरत्वाची जाण देत कवी सांगतो, की शायराच्या मृत्यूनंतरच त्याची शायरी सन्मानिली जाते. शायर मरतो, शायरी अमर होते म्हणूनच तो गालिबला सांगतो,

गालिब, अरे, अमुच्याही दारी, आहेच कीर्ती यायची
फक्त आहे देर थोडी, मरणास अमुच्या यायची

कवीच्या या भावनेत चुकीचे काय आहे? मरणावरची उत्तम शायरी म्हणून कवीची रेलगाडी ही छोटीशी गझल अत्यंत रोचक नि उद्‍बोधक आहे. जीवनाला रेलगाडीची संज्ञा देत कवी सांगतो, की तीत बसणारे सगळे जण सगळ्या गोष्टी करतात, पण कोणाला कोठे उतरायचे, ते मात्रं कोणीच सांगत नाही.

कारण ते स्वतःचे स्वतःलाच माहीत नाही. गाडीतील टीसीला मात्र ते माहीत आहे, तो कोणाचे स्टेशन आले, की तो त्याला सरळ उचलून खिडकीतून बाहेर फेकतो. जीवनरूपी रेलगाडी कोणत्याही स्थानकावर थांबत नाही, ज्यावेळी शायराचे स्टेशन आले. टीसी त्याला उचलायला वाकला तोच

फेकण्या मजला जसा तो, सरसावला थोडा पुढे
देहात्मतेचा कोट नुसता, मी फेकला त्याच्यापुढे
उचलुनी तो कोट त्याने, फेकला खिडकितूनी
केला मला आदाब आणि अदृश्य झाला लाजुनी
रेलही अदृश्य झाली, काही असेही वाचले
तिकिटावरी मी शब्द आता, निर्वाण इतुके वाचले

रसिका, यातील रूपक उलगडत बसायची तरी आवश्यकता आहे का? याच धर्तीवर कवी पत्त्यांच्या माध्यमातून वेदांत सांगू लागतो, ‘राजाला एकका मारतो, नहील्यास दहिला मारतो’ असे म्हणतात; पण खरंतर कोणीच कोणास मारत नसतो, सारे पत्ते एक सारखेच कागदाने बनलेले असतात. त्यांच्यावरचे छाप केवळ वेगळे असतात;

पण या छापामुळे प्रत्येक पत्ता स्वतःला इतरांपासून वेगळा समजायला लागतो. आपण राजाच आहोत, असे पत्त्यातल्या राजाला वाटू लागते. त्यामुळे राणीलाही जाणीव होऊन तीही लाजू लागते. आपण सर्वांत दीन आहोत, याचे वैषम्य दुर्रीला वाटू लागते, तर पंजा चौरीस श्रीमंत वाटू लागतो. पण खरी गोष्ट हीच असते, की सारे समान असतात. पण छापाच्या नादी लागून स्वतःला लहानथोर समजू लागतात. खरं सांगायचं तर

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

नुसता उपाधी भेद, कोणी, राजा नव्हे राणी नव्हे

हा खेळच आपला नाही, आपण तर केवळ सोंगट्या आहोत, खेळणारा जो आहे, त्याला कोणीच पाहिलेले नाही. मात्र कोणी त्याला ईश्वर, तर कोणी अल्लाह वा कोणी येशू म्हणतात. आपण सारे पत्ते आहोत, त्याच्या हातातील पण कौतुक हे घडले, की या पत्त्यातील एका पत्त्याला पत्त्यांचे हे रहस्य कळले, त्याचे बहारदार वर्णन करताना कवी सांगतो-

एका परी पत्त्यास कळले, मर्म हे पत्त्यातले
आहे इथे रंगेल कोणी, पत्ता असा पत्त्यातला
आहे जसा पत्त्यातला तो, नाही तसा पत्त्यातला
नामरुपाचा स्वतःच्या, पत्ताच ना त्याला कधी
नाही कशाची खंत, होतो राजा कधी, दुर्री कधी
हासतो नुसताच, आहे सर्वांहुना हा वेगळा
सांगाल का याहून कोणी, वेदांत काही वेगळा ?

हा रंगेल पत्ता म्हणजे एखादा जाणकार ऋषी, संत हे वेगळे सांगायला का पाहिजे? नि त्याचा सुख-दुःखे समान भाव राजा नि दुर्रीतून व्यक्त होताना दिसतो, त्यामुळेच तो पत्त्यातला असून, पत्त्यातला नसतो. केवळ पत्त्याच्या माध्यमातून कवीने मांडलेला वेदांत सामान्य वाचकालाच नाही, तर मोठमोठ्या रसज्ञ विद्ववानांना नि समीक्षकांना मोहवित राहाते. हे सारे पाहताना कवीची शायरी जशी जोमदार आहे, तशीच त्याची विचारांची बैठकही सकस नि कसदार आहे, असेच म्हणावे लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Cotton Seeds : पहिल्याच दिवशी कपाशी बियाण्यांचा अत्यल्प पुरवठा; आजपासून कापूस बियाणे विक्रीचा होता मुहूर्त

MS Dhoni: धोनी RCB ला देणार सरप्राईज? CSK ने शेअर केलेल्या त्या व्हिडिओने चर्चांना सुरुवात

Share Market Today: अमेरिकन बाजार विक्रमी उच्चांकावरून कोसळले; भारतीय शेअर बाजारात कशी असेल स्थिती?

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

SCROLL FOR NEXT