अमरावती : शेतीच्या सिंचनासाठी महावितरणने सातही दिवस दिवसा वीज पुरवठा करावा, अशी मागणी समोर आली आहे. मात्र, महावितरणला सातही दिवस दिवसा वीज पुरवठा करणे अशक्य आहे. महाराष्ट्र वीज नियामक प्राधिकरणाने आखून दिलेल्या नियमाने काम करणे भाग असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी मुबलक असले तरी वीज पुरवठ्याच्या अडचणींनी शेतकरी त्रस्त झाला आहे. आठवड्यातून तीन दिवस पुरवठा मिळत असते. त्यातही तो रात्रीला असल्याने थंडीत व वन्य श्वापदांसह सरपटणाऱ्या प्राण्यांच्या भीतीच्या छायेत ओलीतासाठी शेतकरी रात्रीचा दिवस करू लागला आहे. वीज पुरवठा दिवसा करावा, अशी मागणी समोर आली आहे.
रब्बी हंगामात चना व गव्हासह संत्रा मोसंबी फळबागांना सिंचनासाठी वीज पुरवठ्याची गरज आहे. सर्वाधिक मागणी फळबागांच्या क्षेत्रातून आहे. मोर्शी व वरूड तालुक्यात चार दिवस रात्री व तीन दिवस दिवसा दहा तास पुरवठा सध्या केल्या जात आहे. या भागातील पाणीपातळी बाराशे फुट खाली गेली आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने पाणी उपलब्ध असले तरी वीज पुरवठ्याच्या समस्येने शेतकरी कंटाळला आहे.
अमरावती परिमंडळात 2 लाख 64 हजार कृषी पंप आहेत. त्यामध्ये तीन ते बारा अश्वशक्तीच्या पाणी खेचण्याच्या मशिन्स आहेत. या सर्व मशिन्सना वीज पुरवठा एकाच वेळी करणे शक्य होत नसल्याने महावितरणने वीज पुरवठ्याचे वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार चार दिवस दिवसा व तीन दिवस रात्री असे सात दिवस वीज पुरवठा केल्या जातो. वेळापत्रक रोटेशन पद्धतीने पाळल्या जात असल्याचे व दर एका महिन्याने त्यात बदल केला जात असल्याचे मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी सांगितले. पाणी पातळी बघून शेतकरी कृषी पंप लावतो, त्यामध्ये तीन ते बारा अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या पंपांचा समावेश असून एकाचे वेळी वीज पुरवठा केल्यास भार वाढून समस्या तांत्रिक निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे एकाच वेळी वीज पुरवठा शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नियमांनुसारच पुरवठा -
महावितरणला वीज पुरवठा करताना महाराष्ट्र वीज नियामक प्राधिकरणाने आखून दिलेले वेळापत्रक पाळणे बंधनकारक आहे. याशिवाय कृषी पंपांवर येणारा भार बघता एकाच वेळी पुरवठा करणे शक्य होत नाही. शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा वापरल्यास विजेची बचत होण्यासोबतच महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरवरील भार कमी होऊ शकणार आहे, असे मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी सांगितले.
हेही वाचा - कोरोनावर प्रभावी ठरतेय 'थायमोसीन अल्फा १',...
दिवसा बारा तास पुरवठा करा -
महावितरणने रात्रीचा पुरवठा बंद करून दिवसा बारा तास वीज पुरवठा करावा. रात्री कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना बिबट्या, रानडुकरे, अशा श्वापदांपासून बचाव करीत सिंचनासाठी पाणी पुरवठा करावा लागत आहे. महावितरणने वेळापत्रकात बदल करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.