Sharad Pawar Resigns : शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे आज प्रकाशन पार पडले. या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केली आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला मात्र कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवृत्तीला विरोध केलाय.
राष्ट्रवादीचे कर्ताधर्ता आणि पक्षाचे पालकत्व सांभाळणारे शरद पवारांचा राष्ट्रवादीला इथपर्यंत आणण्यास मोलाचा वाटा आहे पण तुम्हाला माहिती आहे का राष्ट्रवादीची स्थापना कशी झाली? आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत. (Sharad Pawar Resigns how ncp formed and how was Nationalist Congress Party name decided read history )
शरद पवारांची राजकीय कारकिर्द खूप मोठी आहे. १९८७ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी काँग्रेसचे नेतृत्व राजीव गांधींकडे होते. १९९९ मध्ये त्यांनी एक आक्रमक पवित्रा घेतला आणि त्याचे पडसाद सगळीकडे पसरले.
सोनिया गांधी विदेशी असल्यामुळे त्या पंतप्रधान होऊ नये, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली. त्यांच्यासोबत पी. ए. संगमा, तारीक अन्वरही होते. पुढे यामुळेचे काँग्रेसने पी. ए. संगमा, तारीक अन्वर आणि शरद पवार यांना निलंबित केले. यांना 'काँग्रेस'मधून सहा वर्षांसाठी निलंबित केल्यानंतर राज्यात आणि देशातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
याविषयी शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकात काँग्रेसमधून निलंबित केल्यानंतर कशी राष्ट्रवादीची स्थापना झाली, याविषयी सांगितले.
ते आपल्या आत्मचरीत्रात सांगतात, "निलंबनानंतर विचारविनिमय करण्यासाठी मुंबईत येऊन दाखल झालो. देशातल्या अनेक नेत्यांनी भेटीसाठी रीघ लावली. 'काँग्रेस' विचारांचा पर्याय देण्यासाठी काही करायला हवं, या दिशेनं आमच्या चर्चा सुरू झाल्या.
संगमा यांच्या पाठीशी असणारे ईशान्य भारतातले अनेक आमदार, तारीक अन्वर यांना मानणारे बिहार आणि उत्तरप्रदेशातले अनेक पदाधिकारी, आसामचे माजी मुख्यमंत्री शरश्चंद्र सिन्हा, गुजरातमधले एक ज्येष्ठ नेते सनत मेहता यांच्यासह विविध राज्यांतले ‘काँग्रेस'च्या दुसऱ्या फळीतले नेते मुंबईत दाखल झाले.
'काँग्रेस' विचारांचा पर्याय म्हणून नवा पक्ष स्थापन करावा आणि त्याचं नाव 'राष्ट्रवादी कॉंग्रेस' ठेवावं, असं ठरलं. पक्षासाठी 'चरखा' या निवडणूक चिन्हाची मागणी करण्याचाही निर्णय घेण्यात झाला. त्यानंतर १७ जून १९९९ रोजी 'षण्मुखानंद हॉल'मध्ये सकाळी बैठक झाली."
पवार सांगतात, "सभागृह खचाखच भरलेलं होतं. पक्षाची घटना, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकारिणीची यादी समोर मांडून त्याला मान्यता घेण्यात आली. त्याच दिवशी संध्याकाळी 'शिवाजी पार्क'वर खुलं अधिवेशन घेण्यात आलं. यावेळी 'शिवाजी पार्क' नुसतं ओसंडून वाहत होतं. मैदान तर भरलेलं होतंच, पण आजूबाजूचे रस्तेही ‘राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांनी व्यापून टाकले होते.
यात 'राष्ट्रवादी कॉंग्रेस'च्या निर्मितीचा ठराव एकमतानं गगनभेदी घोषणांच्या निनादात संमत करण्यात आला. राष्ट्रीय जबाबदारी संगमा, तारीक अन्वर आणि माझ्यावर सोपवण्यात आली. पदाधिकारीही जाहीर झाले."
पवार पुढे सांगतात, "महाराष्ट्रातल्या ‘राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर देण्यात आली. राज्या-राज्यात, जिल्ह्या-जिल्ह्यात पक्षाच्या शाखा उद्घाटनाचा, सदस्य- नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झाला. निवडणूक आयोगाकडून पक्षाला अधिकृत पक्षाची मान्यता घेण्यासाठी नोंदणी करण्याचा ठराव झाला.
संसदेतल्या आणि विविध राज्यांतल्या विधिमंडळ सदस्यांच्या संख्येच्या जोरावर 'चरखा या निवडणूक चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. आयोगानं पक्षाला मान्यता दिली, पण 'चरखा' चिन्ह द्यायला नकार दिला. अन्य काही चिन्ह सुचवावं, अशी सूचना केली.
‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या स्थापनेसाठी 'षण्मुखानंद हॉल'मध्ये झालेली बैठक दहा वाजून दहा मिनिटांनी सुरू झाली होती. ही वेळ दाखवणारं घड्याळ, या चिन्हाची मागणी करण्यात आली. निवडणूक आयोगानं ती विनंती मान्य केली."
हे घडत असतानाच देशातल्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. एका नव्या दमानिशी नव्या संघर्षाला आणि वाटचालीला सुरुवात झाली."
अशाप्रकारे राष्ट्रवादीचा जन्म झाला आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाव आणि चिन्ह ठरले. आज राष्ट्रवादी देशासह राज्यात मोठ्या दिमाखाने आणि मजबूतरित्या आहेत आणि याचे श्रेय हे नक्कीच शरद पवारांना जातं. त्यामुळे त्यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवणे, हे स्वाभाविक होतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.