पाचोरा : लोहारी बुद्रुक (ता. पाचोरा) येथे बडगुजर समाजाचे दोन दिवसीय महाअधिवेशन नुकतेच पार पडले. अधिवेशनाचा समारोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला.
याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील सत्तांतर नाट्याचा पाढा वाचून उपस्थितांची चांगलीच करमणूक केली. राज्यातील सत्तांतर नाट्य हे भाजपचे 'ऑपरेशन' होते, हे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केल्याने सारेच अवाक् झाले. (Two day convention of Badgujar community Eknath Shinde Girish Mahajan Gulabrao Patil Talk About State Politics Jalgaon News)
बडगुजर समाज अधिवेशनाच्या समारोपानिमित्त मुख्यमंत्र्यांचा नियोजित दौरा प्रथम रद्द झाला व नंतर पुन्हा हा दौरा निश्चित झाल्याने पोलिस, महसूल प्रशासनासह शिवसेना, भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक झाली. सुमारे पाच तास उशिरा मुख्यमंत्री या समारोप कार्यक्रमात उपस्थित झाले होते.
याप्रसंगी आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, खासदार ज्ञानेश्वर पाटील (खंडवा), माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, सुनीता पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, पदमसिंग पाटील, भाजपचे मधुकर काटे, नंदू सोमवंशी, सुभाष पाटील आदी राजकीय क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.
प्रथम पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना शिंदे मुख्यमंत्री होतील, असे वाटत नव्हते पण हे सारे घडून आले. असा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी तोच धागा पकडत सत्तांतर नाट्यासंदर्भात स्पष्टोक्ती दिली. प्रथम मुख्यमंत्री शिंदे यांना मोठ्या मनाचा माणूस, जाणता राजा, रात्री उशिरापर्यंत काम करणारा, चार तासही झोप न येणारा अशी विशेषणे लावली.
ऑपरेशनला सुरुवात तर केली पण हे यशस्वी होईल, असा विश्वास वाटत नव्हता. हे सोपे काम नव्हते. उद्धव ठाकरे सरकारला कंटाळून प्रथम १८ आमदार निघाले आणि तो आकडा ४० पर्यंत गेला. पुढे एकनाथ शिंदे राजा व मागे सर्व सैन्य आल्याने शेवटी सगळे जमले व एकदाचे व्हायचे ते झाले. ही लाट एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवून गेली व राज्याला न्याय देणारे सरकार सत्तेवर आले, असे स्पष्ट केल्याने उपस्थितांनी टाळ्यांसह घोषणाबाजी केली. त्यामुळे हशाही पिकला.
शेवटी मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवराय व चामुंडा मातेचा जयघोष करत मनोगत सुरू केले. आपल्या मनोगतात त्यांनी' मैने एक बार कमिटमेंट करली तो मै खुद की भी नही सुनता...’ हा सलमान खानचा डायलॉग मारत मी शब्द पाळतो म्हणून लोकांनी विश्वास ठेवला. म्हणूनच ५० लोक माझ्यासोबत आले व मी मुख्यमंत्री झालो.
गिरीशभाऊ सगळे खेळ खेळणारा चांगला खेळाडू, आहे असा शब्दप्रयोग केला. परदेशात गोविंदा पाठविणारा पहिला मंत्री गिरीशभाऊ असल्याचे स्पष्ट केले. कुणाचेही नाव न घेता आम्ही ३० जूनलाच मोठ्ठी हंडी फोडली. बाळासाहेबांचे विचार व आनंद दिघे यांचा आदर्श समोर ठेवून त्यावेळी निर्णय घेतला व त्याच दृष्टिकोनातून गेल्या सहा महिन्यांपासून आमचे सरकार कामकाज करत आहे. लोकहिताचे विक्रमी निर्णय घेत आहे.
..तेव्हा गुलाबरावांना सोबत येण्यात अडचणी
सगळे एकजुटीमुळे शक्य होत असून, गुलाबरावांना माझ्यासोबत येण्यात अनेक अडचणी आल्या. ते कसे आले? हे सांगणे योग्य होणार नाही, असे म्हणत त्यांनी मागे बघून सांगू का, सांगू का असे दोन वेळा म्हटल्याने हास्याचे फवारे उडाले. काय घडले, कसे घडले हे सर्व जगाने पाहिले. त्या काळात आम्हीच मीडियाला जास्त बातम्या दिल्या. सत्तांतर नाट्याचा मुख्यमंत्र्यांसह मंत्री महाजन व गुलाबराव पाटील यांनी वाचलेला पाढा महाअधिवेशनाच्या समारोपात मांडला गेला. त्याची चर्चा आजही तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खमंगपणे चर्चिली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.