जालना : जालना जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाची वार्षीक सरासरी ६१६.२० मिलिमीटर आहे. परंतु यंदाच्या जोरदार पावसामुळे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच पावसात जिल्ह्याने पावसाची वार्षीक सरासरी पार केली आहे. (ता.१) जून ते (ता.१४) ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात तब्बल ६२१.३१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद शासनाच्या महावेध संकेतस्थळावर झाली आहे.
परिणामी जिल्ह्यात मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला असून जालना शहराला पाणी पुरवठा करणारे घाणेवाडे जलाशयही पूर्ण क्षमतेने भरले आहे. दरम्यान जिल्ह्यात मागील चोवीस तासांपासून पावसाची अधून-मधून संततधार सुरू आहे. शुक्रवारी (ता.१४) ही जालना शहरासह जिल्ह्यात ठिक-ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे.
जालना जिल्हा हा कमी पर्जन्यमानाच्या पट्ट्यात मोडतो. त्यामुळे जिल्ह्यात सतत दुष्काळी परिस्थिती असते. मात्र, मागील दोन वर्षांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळ दूर झाला आहे. जिल्ह्यात आठही तालुक्यात वार्षीक सरासरीपेक्षा यंदा ऑगस्ट महिन्यात अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ६१६.२० मिलिमीटर पाऊस पडतो. गतवर्षीही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. त्याच प्रमाणे यंदाही जिल्ह्यात आतापर्यंत जोरदार पाऊस झाला आहे. परिणामी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने जिल्ह्याची वार्षीक सरासरी पार केली आहे.
जिल्ह्यातील आठ ही तालुक्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान यंदा जोरदार पावसामुळे जालना शहराला पाणी पुरवठा करणारे घाणेवाडे जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तर जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्पांमध्ये ६३.६४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर तीन मध्यम प्रकल्प ओव्हर-फ्लो झाले आहेत. तर ५७ लघु प्रकल्पांमध्ये ४३.७८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला असून तीन लघु प्रकल्प ओव्हर-फ्लो झाले आहेत. तर १६ लघु प्रकल्पांची पाणीपातळी आजही जोत्याखाली आहे.
दरम्यान मागील तीन दिवसांपासून जालना शहरात ढगाळ वातावरण आहे. त्यात गुरूवारी (ता.१३) दुपारपासून शहरासह जिल्ह्यात ठिक-ठिकाणी पावसाची रिमझिम सूरू आहे. गुरूवारी (ता.१३) रात्रभर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती. परिणामी शुक्रवारी सकाळीपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात १२.१३ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद शासनाच्या महावेध संकेतस्थळावर झाली आहे.
तर शुक्रवारी (ता.१४) पहाटेपासून जालना शहरासह जालना तालुका, अंबड, घनसावंगी, भोकरदन आदी तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू होती. या पावसाच्या चिकचिकीमुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला असून कोरोनाच्या काळात साथींच्या रोगांचा प्रादूर्भाव होण्याची भिती निर्माण झाली आहे.
संपादन-प्रताप अवचार
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.