Startup Day
Startup Day esakal
नाशिक

National Startup Day : वेड स्टार्टअप्सचे...

सकाळ वृत्तसेवा

स्टार्टअप म्हणजे व्यवसायाचे नावीन्यपूर्ण स्वरूप. स्टार्टअप म्हणजे व्यवसायाचा असा प्रकार असतो, ज्यामध्ये अस्तित्वात असलेल्या कोणत्यातरी महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले जाते. त्यासाठी नावीन्यपूर्ण विचारसरणीची मदत घेतली जाते. नावीन्यपूर्ण म्हणजे एखाद्या समस्येवर नवविचाराणे, धोपट मार्ग न अवलंबता उपाय शोधणे. नावीन्यपूर्ण उपाय- उत्पादने, प्रक्रिया, सेवा, तंत्रज्ञान किंवा कलाकृतीही असू शकतात.

नावीन्यपूर्ण उपाय तंत्रज्ञानावरच आधारित असते असे नाही. दैनंदिन जीवनात आपण ज्याला जुगाड म्हणतो तेही एक नावीन्यपूर्ण संकल्पना/ इनोव्हेशन असू शकते. म्हणून स्टार्टअप म्हणजे एखादे अॅप बनविणे किंवा इंटरनेटवर काही चालू करणे असे नसून यात तंत्रज्ञानविरहित व्यवसायही असू शकतात. बऱ्याचदा स्टार्टअप म्हणजे फक्त एखादा लहान उद्योग, अशी गैरसमजूत होते. (National Startup Day Special Article About New startup of business or income Nashik News)

परंतु कुठल्याही स्टार्टअपमध्ये भविष्यात मोठा उद्योग होण्याची क्षमता असते. नेमक्या कुठल्या उद्योगाला स्टार्टअप म्हणायचं, हेसुद्घा समजणं आवश्यक आहे. एखाद्या गृहिणीने नव्याने सुरू केलेले पोळी-भाजी केंद्र हे तिच्यासाठी स्टार्टअपच असते. फरक इतकाच, की त्या केंद्राला आपण स्टार्टअप म्हणत नाही. राज्य शासनाच्या नियमानुसार असा उद्योग, जो खालील बाबींची पूर्तता करतो त्याला स्टार्टअप म्हटले जाते.

- कंपनीचा प्रकार (खासगी मर्यादित, नोंदणीकृत भागीदारी किंवा मर्यादित उत्तरदायित्व भागीदारी) व
- वार्षिक उलाढाल (स्थापनेपासून कोणत्याही आर्थिक वर्षी १०० कोटींपेक्षा जास्त नसावी) व
- कंपनीचे वय (दहा वर्षांपेक्षा जास्त नसावे) व
- नावीन्यपूर्ण (Innovative) विचारसरणी
अशा उद्योगांस भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडून स्टार्टअप म्हणून मान्यता प्राप्त होते.

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

स्टार्टअपविषयी एक गैरसमज प्रचलित आहे, तो म्हणजे फक्त तरुणांनी सुरू केलेल्या उद्योगांना व शहरातील उद्योगानांच स्टार्टअप म्हणायचं का, याचं उत्तर अर्थातच नाही असं आहे. कारण नावीन्यतेला भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात. त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. स्थानिक समस्या व त्याला सोडविण्याचा उपाय स्थानिक नागरिकांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांतून मिळू शकते.

तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी वयोमर्यादेची आवश्यकता अजिबात नसते. नावीन्यपूर्ण संकल्पना वयाच्या कुठल्याही टप्प्यावर सुचू शकते. मात्र हेही खरं, की आज भारतातील एकूण स्टार्टअप उद्योजकांपैकी जास्तीत जास्त उद्योजक हे पस्तीशीच्या आतील आहेत.

स्टार्टअप्सना यशस्वी होण्यासाठी बऱ्याच घटकांची/बाबींची भूमिका महत्त्वाची ठरते. या परिसंस्थेतील विविध घटक/बाबी म्हणजे तज्ज्ञ मार्गदर्शन, ग्रँट, इनक्युबेशन, सीड फंडिंग, एंजल इन्व्हेस्टमेंट, व्हेंचर कॅपिटल, क्राउड फंडिंग, अॅक्सेलेरेशन, युनिकॉर्न आदी. स्टार्टअपबाबत महत्त्वाची बाब म्हणजे आजकाल स्टार्टअप्सची क्रेझ असली तरी प्रत्येक स्टार्टअप यशस्वी होईलच असे नसते.

स्टार्टअप म्हणजे नियमित व्यवसाय पद्धती नसून नवनवीन प्रयोग असतात. स्टार्टअप भविष्यात मोठा होईल याचा विश्वास असतो; पण कोणतीही शाश्वती नसते. सर्व बाबी या प्रायोगिक तत्त्वावर सुरू होत असतात. नावीन्यपूर्ण कल्पना यशस्वी ठरली तर नवउद्योजक स्टार्टअपच्या मदतीने कोट्यवधी कमवितो अन्यथा पुन्हा नवकल्पनेला न्याय देण्यास प्रयत्नशील असतो.

येणार काळ हा स्टार्टअप व नावीन्यतेचा असणार आणि काळाची हीच गरज ओळखून तरुणांना संधी देत, त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नावीन्यपूर्ण आविष्कारांची परंपरा अखंड राहावी, यासाठी शासनाच्या पातळीवर सातत्यपूर्ण प्रयत्न चालू आहेत. स्टार्टअप्सना व नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन देऊन देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेस बळकट करण्यासाठी शासनाद्वारे विविध उपक्रम व योजना राबविल्या जात आहेत.

केंद्र शासनाच्या स्तरावर स्टार्टअप इंडिया, नीती आयोग, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, अग्नी, बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (BIRAC), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय इत्यादी विभागामार्फत विशेष योजना व उपक्रम राबविले जात आहेत.
नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य नावीन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८ जाहीर केले. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी (Maharashtra State Innovation Society) कार्यरत आहे.

नावीन्यता सोसायटीमार्फत स्टार्टअप वीक, इनक्यूबेटर्सची स्थापना, स्टार्टअप यात्रा, ग्रँड चॅलेंज, हॅकॅथॉन, गुणवत्ता परीक्षण व प्रमाणन अर्थसहाय्य योजना, बौद्धिक संपदा हक्क अर्थसहाय्य योजना, महाराष्ट्र व्हर्च्युअल इनक्युबेशन सेंटर, हिरकणी महाराष्ट्राची यांसारख्या अनेक कार्यक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या कार्यक्रमांमुळे राज्यातील अनेक नवउद्योजकांना उद्योजकतेशी निगडित विविध प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध होत आहे. अशा विविध उपक्रम व यशस्वीतेमुळे देशातील एकूण ८८ हजार १३६ मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपैकी सर्वाधिक १६ हजार २५० स्टार्टअप्स १८ टक्के महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान पाच ते सात मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत. अगदी दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यामध्ये १२, तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये २० मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत.

सेच मुंबईमध्ये सुमारे पाच हजार ९००, पुण्यामध्ये चार हजार ५३५, औरंगाबादमध्ये ३४२, सिंधुदुर्गमध्ये १९ मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत. अभिमानाची बाब म्हणजे देशातील १०८ यूनिकॉर्न स्टार्टअप्सपैकी २५ यूनिकॉर्नस महाराष्ट्रातील आहेत (२३ टक्के). यूनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी जिचे मूल्यांकन १ बिलियन अमेरिकन डॉलर्स (१०० कोटी डॉलर) म्हणजेच रुपये आठ हजार कोटींपेक्षा जास्त आहे.

"आज काल स्टार्टअप, इनोव्हेशन, यूनिकॉर्न हे परवलीचे शब्द झाले आहेत. गेल्या दशकभरात या शब्दांनी विशेषतः तरुणाईला भुरळ घातली आहे. मलाही एक स्टार्टअप सुरू करायचंय, असं म्हणणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. तेव्हा स्टार्टअप म्हणजे नेमकं काय, त्याचं वाढतं आकर्षण का आहे, त्याला आज इतकं महत्त्व का दिलं जात आहे, चला तर याबद्दल थोडं जाणून घेऊ यात..!"
- अमित कोठावदे, सहाय्यक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''अजित पवारांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही'' राज ठाकरे पुण्यात नेमकं काय म्हणाले?

T20 WC 2024 : 24 मे पूर्वी चार दिवस आधी... बीसीसीआयचा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना दिलासा

Sai Sudarshan GT vs CSK : साई सुदर्शनने केला मोठा विक्रम; सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागं

GT vs CSK Live IPL 2024 : शुभमन पाठोपाठ साईचं शतक; अखेर सीएसकेच्या तुषार देशपांडेने जोडी फोडली

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगातून सुटका, 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT