बावधन बुद्रूक : शहरीकरणाला साजेसा गावचा चेहरामोहरा 

बावधन बुद्रूक : शहरीकरणाला साजेसा गावचा चेहरामोहरा 

एकेकाळी हिरव्यागार शेतीची झालर पांघरलेल्या बावधन बुद्रूकच्या जमिनींवर सिमेंटचे जंगल उभे राहिले. नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी टोलेजंग, आलिशान इमारती उभारल्या. शहरीकरण झालेल्या येथील ग्रामपंचायतीनेही भौतिक सुविधा पुरवीत गावचा चेहरामोहरा बदलला. नोकरदार, व्यावसायिकांचे ‘रेसिडेन्शियल डेस्टिनेशन'' झालेल्या या गावात वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पुरेसे पाणी आणि कचरा व्यवस्थापनाचे आव्हान महापालिकेसमोर असणार आहे. शहरीकरण झाले असले तरी येथील ग्रामस्थ गावप्रथा, परंपरा, धार्मिक रीतिरिवाज आजही जपत आहेत.

शहराच्या सीमारेषेवर असलेल्या बावधनचा १९९५ मध्ये महापालिकेत समावेश झाला होता, परंतु पुन्हा ते वगळले गेले. मुंबई - बंगळुरू महामार्ग याच गावातून जातो. हिंजवडीची आयटीनगरीही येथून सहा किलोमीटर अंतरावर आहे. पुणे शहरही जवळ असल्याने उच्चशिक्षित चाकरमाने आणि व्यावसायिकांचे बावधन म्हणजे राहण्याचे उत्तम ठिकाण झाले. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांत येथे मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले. रामनदीवर अतिक्रमण करीत तिचा अक्षरश- नाला करून इमले उभे राहीले. 

तीन वर्षांर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या पियुषा दगडे सरपंच झाल्या. थेट जनतेतून निवडून येण्याचा राज्यातला पहिला मान त्यांना मिळाला.  ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात सुमारे पंधरा कोटी रुपयांची विकासकामे केली. सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते झाले, स्मशानभूमी सुधारली, ठिकठिकाणी भूमिगत सांडपाणी वाहिन्या  टाकण्यात आल्या.  शहरीकरणाला साजेशा सुविधा ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिल्या आहेत, तथापि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत येथे नागरिकांना पुरेसे पाणी पुरविणे, त्याचप्रमाणे कचऱ्याचे व्यवस्थापन करणे हे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. 

ग्रामस्थ म्हणतात...
बबन दगडे (माजी सरपंच) -
गाव महापालिकेत गेल्यामुळे ग्रामस्थांना वाढीव कराचा बोजा सहन करावा लागेल. ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या दर्जेदार भौतिक सुविधा शहरात गेल्यानंतर ग्रामस्थांना मिळाल्या पाहिजे, ही अपेक्षा.

विशाल कोलते (भाजीपाला व्यावसायिक) - जी गावे यापूर्वी महापालिकेत घेतली तीच विकासापासून वंचित आहेत. शहरात गेल्यामुळे छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. छोट्या जागेत बांधलेल्या घराच्या नवीन वाढीव बांधकामासाठी महापालिकेच्या विविध मंजुऱ्या मिळविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. शहरात गाव गेले तरी त्याचे गावपण टिकून राहावे, हीच अपेक्षा आहे.

मयूर कांबळे (रहिवासी) - आम्हाला दिवसाआड पाणी मिळते. शहरात गेल्यामुळे ते दररोज मिळणे अपेक्षित आहे. पीएमआरडीएच्या राखीव जागेवर रूग्णालय, उद्यान, क्रीडांगणासारख्या सार्वजनिक सुविधा महापालिकेकडून मिळू शकतात, परंतु ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून एकमुखाने घेतलेला दारूविक्री बंदीचा निर्णय शहरात गेल्यामुळे टिकणार का, ही मात्र शंका आहे.

महापालिकेला करण्यासारखे कामच ग्रामपंचायतीने शिल्लक ठेवलेले नाही, परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे वीस लाख लिटरची पाण्याची टाकी, राम नदीतील भूमीगत सांडपाणी वाहिनी, ही कामे अजून बाकी आहेत. त्यामुळे जोपर्यंत महापालिकेच्या निवडणुका लागत नाही, तोपर्यंत गावच्या सरपंचालाच प्रशासक म्हणून काम करण्याची संधी मिळावी. 
-  पियुषा दगडे, सरपंच

दृष्टिक्षेपात गाव...
४०००० - लोकसंख्या
५५८ - हेक्टर क्षेत्रफळ
सरपंच - पियुषा दगडे (भाजप) 
१७ - सदस्यसंख्या
१४ कि.मी. स्टेशनपासून अंतर 
  वेगळेपण : बापूजीबुवाची यात्रा, पुणे विभागीय महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी, राजा दिनकर केळकर संग्रहालय (प्रस्तावित)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com