खडकवासला : नियोजनबद्ध विकासाची भूमिपुत्रांना आस 

Khadakwasala
Khadakwasala

जल व विद्युत विषयावर संशोधन करणारी संस्था, स्वातंत्र्यापूर्वी बांधलेले खडकवासला धरण व संरक्षण क्षेत्रात शस्त्र निर्मितीचे संशोधन करणारी संस्था यांमुळे खडकवासला गावाचे नाव जगाच्या नकाशावर आहे. याचा भूमीपुत्रांच्या उरात देशाभिमान आहे, परंतु या संस्थांमुळे गावाचे गावपण हिराविल्याने ग्रामस्थ मात्र विकासापासून कोसो दूर राहिले आहेत. महापालिकेत समावेश होत असताना ग्रामस्थांच्या मनात आता नियोजनबद्ध विकासाची आस आहे.

पूर्वी गावात धर्मशाळा असल्याने रस्त्यावरील मोठे गाव असल्याचा संदर्भ लागतो. मुळशीचे पाहिले आमदार व पुण्याचे माजी महापौर नामदेवराव मते, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण मते, माजी सभापती उत्तमराव मते, केशवराव मते यांची राजकीय पार्श्वभूमी आहे. गावाच्या पश्चिम व उत्तरेला डीआयएटी संस्था, धरण व नदी वाहते. पश्चिम ते दक्षिणेला शेतजमीन डोंगर रांग, पूर्वेला कोल्हेवाडी व सीडब्ल्यूपीआरएस संस्था आहे. गावातून पूर्व- पश्चिम असा पुणे- पानशेत रस्ता जातो. यामुळे गावाचे दोन भाग होतात. हा रस्तादेखील अरुंद आहे. शेतकऱ्यांनी शेतीसाठी धरणातून जीवन साधना संस्थेच्या माध्यमातून पाणी योजना राबविली आहे. पूर्वी १०० शेतकरी पाणी घेत होते आता ही संख्या साठपर्यत कमी झाली आहे.

गावात महापालिकेच्या बंद जलवाहिनीतून पाणी घेऊन पाणी योजना केली आहे. जल शुद्धीकरण केंद्र नाही, परंतु क्लोरिन टाकून पाणी पुरवठा होतो. कोल्हेवाडीच्या काही भागात पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. गावठाणातील काही जागा कालव्यासाठी ताब्यात घेतली. परिणामी अंतर्गत रस्ते रस्ते अरुंद झाले. गावाला जास्त जागा शिल्लक नसल्याने गावालगत सर्व्हे नंबरमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. गावात ग्रामपंचायतीसमोर मुख्य व अंतर्गत रस्त्यावर भाजी मंडई भरते. खडकवासला पर्यटन स्थळ असल्याने शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्टी, पावसाळी दिवसांत चौपाटी परिसरात पर्यटकांची गर्दी होती. अरुंद रस्त्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्याचा स्थानिकांना अतोनात त्रास होतो. 

दृष्टिक्षेपात गाव...

  • लोकसंख्या : ९ हजार २०११ च्या जनगणनेनुसार, सध्या २५ हजार
  • १९०० एकर क्षेत्रफळ
  • सौरभ मते (राष्ट्रवादी काँग्रेस) - सरपंच
  • १७ सदस्यसंख्या
  • १३ कि.मी. स्वारगेटपासून अंतर 
  • वेगळेपण : केंद्रीय जल व विद्युत संशोधन, प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थांचे प्रकल्प, खडकवासला धरण, महात्मा गांधी यांचे ७० वर्षांपूर्वी आगमन

ग्रामस्थ म्हणतात...
सचिन पाटील (नोकरदार) - अंतर्गत रस्ते मोठे होऊन रस्त्यावरील अतिक्रमणे काढली पाहिजेत. महापालिकेने ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलांसाठी सुविधा निर्माण कराव्यात.

विलास मते (माजी जिल्हा परिषद सदस्य) - शासकीय यंत्रणा चालविणारी व्यक्ती अनुभवी व सक्षम असेल, तर कारभार योग्य रीतीने चालतो. मात्र प्रत्येकाला पद देण्याच्या नादात प्रशासनावर वचक राहत नाही. त्यामुळे महापालिका आल्याने जीवनमान सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा.

महादेव मते (ग्रामस्थ) - ग्रामपंचायतीलादेखील आता थेट केंद्र सरकारकडून विकास निधी मिळत असल्यामुळे ग्रामपंचायत सक्षम होत आहेत. महापालिकेत समावेश होणार असेल तर शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण नको.

संदीप मते (उद्योजक) - भाजी मंडईला जागा नसल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर भाजी विकावी लागते. धरण चौपाटीवर सुट्टीच्या दिवशी गर्दी होते. चौपाटीचे नियोजन होऊन स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा.

महापालिकेत समावेश झाल्याने घरपट्टीमध्ये मोठी वाढ होईल, मात्र गावाचा मोठ्या प्रमाणात रचनात्मक विकास कमी वेळेत होईल. पीएमआरडीएने प्रस्तावित केलेले शेतामधील रस्ते  तातडीने होणे गरजेचे असून, शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळावा. 
- सौरभ मते, सरपंच 

(उद्याच्या अंकात वाचा कोंढवे धावडे गावाचा लेखाजोखा)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com