Gofan Article esakal
Blog | ब्लॉग

गोफण | टोलधाडीला फोडून काढण्यासाठी राजासाब सज्ज

संतोष कानडे

राजासाब ठाकूर हे एक कार्यधुरंधर व्यक्तिमत्व... त्यांच्या एका इशाऱ्याने राज्यात खळ्ळ..खट्याक्... असे आवाज होईत. त्यामुळे सगळेच त्यांना टरकून असत. त्यांचं घर म्हणजे एखाद्या 'तीर्थापेक्षा' कमी नव्हतं. देशातल्या अनेक दिग्गजांनी त्यांच्या महली भेटी देऊन पाहुणचार घेतलेला होता. व्यापारी म्हणू नका, उद्योगी म्हणू नका, कलाकार म्हणू नका की दिग्गज पुढारी म्हणू नका... सगळे त्यांना मानत.

अडचण फक्त एकच होती. ती म्हणजे आराम! राजासाब ठाकूर फारकाही घर सोडून कुठे जात नसत. महिनोन् महिने लोटले तरी त्यांना शहर सोडावं वाटत नसे. संगीत, भोजन, झोप अन् चित्रपट हे त्यांच्या आवडीचे विषय. त्यामुळे त्यांची कांती कायम सुखलोलूप भासे. कधीतरी भाषण करण्याची वेळ त्यांच्यावर येई, परंतु त्यासाठी त्यांना हे सगळं सुख बाजूला सारुन अभ्यास करावा लागे.

त्यांचं भाषण म्हणजे पर्वणीच म्हणा. एकून्एक माणूस देहाचा कान करुन त्यांना ऐकत असतो. ताटात बासुंदीची वाटी असावी पण ती शेवटची असावी; कसं वाटेल? तसं त्यांचं भाषण. आणखी पाहिजे.. आणखी पाहिजे असं वाटत असतानाच ते बोलणं थांबवत अन् पुढे कधीतरी बोलू असं म्हणून निघून जात. त्यांचा हा गुण राज्याच्या कारभार हाकणाऱ्या नाथबापू एकशिंगेंना परमेश्वराने द्यावा, असं साकडं काहीजणांनी मागे घातलं होतं म्हणे.

असो, तर राजासाब ठाकूर आज रात्री लवकर झोपायचं म्हणून गडबड करीत होते. रोज शांत चित्ताने देशविदेशातला एखादा सिनेमा बघत बघत झोपायची त्यांना सवय. परंतु उद्या सकाळी लवकर उठायचं होतं, म्हणून त्यांनी लुंगी लावली अन् डोळे घट्ट मिटून घेतलं. घरच्यांना लवकर उठवायला सांगून ते झोपी गेलं.

राजासाब ठाकूर हे पुढारलेल्या पुढाऱ्यांपैकी नव्हते. जरा वेगळा विचार करण्याची त्यांची सवय होती. रात्रं-दिवस जागून ते एखादी योजना आणीत पण पुढे त्याची अंमलबजावणीत कमी पडत. मागे दशभरापूर्वी त्यांनी एक आंदोलन हाती घेतलं होतं. म्हणे. तेच ते खळ्ळ..खट्याक.. आंदोलन. तेव्हा त्यांच्या सवंगड्यांनी असाकाही राडा घातला की विचारु नका.

एवढ्या वर्षांनंतर पुन्हा राजासाब यांना त्या आंदोलनाची आठवण झाली. जुने दिवस आठवून त्यांना त्यावर एक सिनेमा करावा वाटला. त्या विद्रोहामुळे किती चर्चा झाली..किती यश पदरात पडलं याचा विचार ते मनोमन करीत होते. तेवढ्यात त्यांना आयडियाची कल्पना सुचली. पुन्हा आंदोलन पेटवलं तर..? अन् हो ठरलं!

राजासाब यांनी सरकारला इशारा दिला. पुन्हा खळ्ळ..खट्याक होणार.. नीट लक्ष द्या नाहीतर एकेक छावणी फोडून काढीन. छावणी म्हणजे ये-जा करणाऱ्या वाहनांकडून कर आकारणारी टोळी. या टोळधाडीला फोडून काढण्यासाठी त्यांचं सवंगडी सज्ज असत. फक्त आदेशाची काय ती देरी.

राजासाब फोडाफोडीची भाषा करतायत सुभेदार नाथबापू एकशिंगे खडबडून जागे झाले होते. नाथबापूंनी ७२ देशांमध्ये चर्चा घडवून आणून खऱ्या अर्थाने 'फोडाफोडी' या शब्दाला सर्वसामान्यांचा शब्द म्हणून मान्यता मिळवून दिली होती. त्यामुळे अशा फोडाफोडींवरचा इलाज त्यांना माहिती होता.

तातडीने दोघांच्या भेटी ठरल्या. राजासाब बोलले, मला आत्ताच्या आत्ता टोलधाड बंद पाहिजे नाहीतर मी फोडून काढीन सगळं... मजाक लावलाय काय? मागे आम्ही टोल बंद केला होता, तुम्ही सुरु कधी केला? आम्हाला सांगायचं तरी... आता बंद म्हणजे बंद बस्स!

त्यावर नाथबापू एका विशिष्ट अध्यात्मिक स्वरात बोलले, साहेब तुम्ही म्हणाल तसं. तुम्ही म्हणालात आत्ता बंद तर आत्ता बंद! तुम्ही म्हणालात उद्या बंद तर उद्या बंद! आम्ही तुमचेच, तुम्हीही आमचे.. तुमच्या शब्दाबाहेर आम्ही नाहीत अन् आमच्या शब्दाबाहेर तुम्ही- जावू शकता. म्हणून म्हणतो थोडा वेळ द्या. एक व्यंगचित्र काढायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ नाही मागणार-

परंतु माणसाने आराम कराययं ठरवल्यानंतर जेवढा वेळ लागतो तेवढा तर तुम्ही द्यालच. शेवटी तुम्ही मोठ्या मनाचे, मार्गदर्शक, कष्टाळू अन् कार्यधुरंधर व्यक्तिमत्व आहात. त्यामळे जरासा वेळ द्या..इवलासा तरी. नाथबापू बोलत होते तेवढ्यात त्यांना राजासाब यांनी थांबवलं.

''घ्या वेळ. आराम करण्याएवढा वेळ हवाय ना, एक महिन्याचा वेळ देतो परंतु टोलधाड थांबवा. नाहीतर माझे लोक फोडून काढतील त्या लुटारूंना.'' असं म्हणत राजासाब निघून गेले. नाथबापूंनी अध्यात्मिक वस्त्र बाजूला ठेवून दाढीवरुन हात फिरवत निरागस हास्य केलं... वाटाघाटीत जिंकण्याचा त्यांचाएवढा अनुभव क्वचितच कुणाला असेल...!

समाप्त

संतोष कानडे

(santosh.kanade@esakal.com)

'गोफण'चे मागील सर्व भाग वाचण्यासाठी खाली लिंक दिल्या आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

Solapur Rain Update:'उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस'; पंढरपुरात चंद्रभागा दुथडी, मंदिरांना पाण्याचा वेढा

Asia Cup : मी श्रेयस, यशस्वीच्या जागी असतो तर संघासाठी खेळणं सोडून...; R Ashwin कडून गौतम गंभीर अन् अजित आगरकरचा समाचार..

SCROLL FOR NEXT